मुंबई पालिकेची नवी वॉर्ड रचना निवडणूक आयोगाने मान्य केली
मुंबई | प्रतिनिधी
मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक मार्च महिन्यात होणे अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता पालिकेने नव्या 9 वॉर्डाची वाढ केली आहे. मुंबई महापालिकेने तयार केलेल्या या नव्या वॉर्ड रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. तसेच वॉर्डाच्या सीमा जाहीर करुन हरकती व सूचना मागविण्यासही निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचे आता लवकरच बिगुल वाजणार हे स्पष्ट झाले आहे.
मुंबई महानगरपालिकेत 227 वॉर्ड आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या वाढल्याने राज्य सरकारने 9 वॉर्ड वाढवले आहेत. यामुळे मुंबई महापालिकेत आता 236 वॉर्ड झाले आहेत. 227 वरून 236 वॉर्ड करण्याला भाजपने विरोध केला होता. त्यासाठी भाजप हायकोर्टात गेली असता हायकोर्टाने भाजपची याचिका फेटाळली होती. त्यानंतर 236 वॉर्डची प्रभाग पुनरर्चना अहवाल मुंबई महापालिकेकडून राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला होता. हा अहवाल निवडणूक आयोगाने मान्य केला आहे.
236 प्रभागाच्या सीमा ठरवून त्याबाबत सूचना व हरकती मागवाव्यात व त्याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर करावा, असे पत्र निवडणूक आयोगाने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पाठवले आहे. निवडणूक आयोगाने प्रभाग पुनर्रचनेवर हरकती व सूचना मागविणे व त्यानुसार सुनावणी देण्याचा कार्यक्रम आखून दिला आहे. त्यानुसार 1 फेब्रुवारीला निवडणूक प्रभागाच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे व त्यास प्रसिद्धी देणे. 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान प्रारूप अधीसूचनेवर हरकती व सूचना मागवणे, 16 फेब्रुवारीला प्राप्त झालेला हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे. 26 फेब्रुवारीला राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकृत केलेल्या अधिकार्यांमार्फत हरकती व सूचनासंदर्भात सुनावणी देण्याचा अंतिम दिनांक असणार आहे. 2 मार्चला सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकारी यांनी केलेल्या शिफारसी विहित नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने पालिका आयुक्तांना केल्या आहेत.