“मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन मोदींशी गुलूगुलू बोलणार, स्वत:चे संबंध चांगले ठेवणार अन्…”; मनसेचा टोला
मुंबई |
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आज, सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. मात्र या बंदला भाजपाने विरोध केला आहे. असं असतानाच आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही या बंदला विरोध दर्शवला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राजकारणासाठी महाराष्ट्राच्या जनतेला का वेठीस धरलं जात आहे असा प्रश्न उपस्थित केलाय. मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन मोदींची भेट घेऊन स्वत:चे त्यांच्यासोबतचे राजकीय संबंध चांगले ठेवतात आणि बंदची हाक देऊन जनतेला वेठीस का धरतात?, असं देशपांडे यांनी विचारलं आहे. “उत्तरप्रदेश येथील लखीमपुर खेरी येथे झालेली दुर्घटना दुर्दैवी आहे त्याचा विरोध झालाच पाहिजे. पण ज्या वेळेस संसदेत कायदा पास होत होता त्यावेळेस महाविकास आघाडीतील खासदार शेपटी घालून का गप्प होते. त्यावेळेस त्यांनी लोकसभेत का नाही आवाज उठवला. शरद पवार त्यावेळेस संसदेत का नव्हते?,” असा प्रश्न देशपांडे यांनी उपस्थित केलाय.
“ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. महाराष्ट्रातील जतना करोनामुळे आधी त्रस्त आहे. तुम्ही पुन्हा जनतेला सणासुदीच्या काळात वेठीस धरून कंबरडे मोडताय जर तुम्हाला निषेध करायचा आहे तर एक दिवसीय विधानसभेचे अधिवेशन बोलवा. निषेधाचा ठराव मांडा, चर्चा घडवा. असाही निषेध होऊ शकतो. तुम्हाला जनतेलाच का वेठीस धरायचं आहे. मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन मोदींशी गुलूगुलू बोलणार. तुमचे संबंध तुम्ही चांगले ठेवणार आणि राजकारणासाठी महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरणार का?”, असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केलाय. आमच्या काही ओळखीतील चहावाल्यांना दुकान बंद करण्यास पोलिसांनी सांगितलं असल्याचा दावा संदीप देशपांडे यांनी केलाय. “चहावाल्यांना बंद करण्याचे काम पोलीसच करत आहेत. पोलीस प्रशासनाचे आहेत की महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत?” असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.