परीक्षा, निकालाचा ८१ टक्के विद्यार्थ्यांना ताण ; ‘एनसीईआरटी’च्या सर्वेक्षणातून स्पष्ट
पुणे | महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
देशभरातील ८१ टक्के विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अस्वस्थेतेचे कारण अभ्यास, परीक्षा आणि निकाल असल्याचे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. ५१ टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकण्यात अडचणी आल्या, तर जवळपास ४५ टक्के विद्यार्थी आपल्या शारिरिक स्थितीबाबत समाधानी नसल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले.
शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्याशी संबंधित असलेला दृष्टिकोन समजून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांपैकी ४३ टक्के विद्यार्थ्यांनी शिक्षणातील बदल झटपट स्वीकारता आल्याचे नमूद केले. त्यात उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे (४६ टक्के) प्रमाण माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांपेक्षा (४१ टक्के) जास्त आहे. २८ टक्के विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचे दडपण येते. ७३ टक्के विद्यार्थी शालेय जीवनाबाबत समाधानी आहेत. तर, ४५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी आपल्या शरीराविषयी समाधानी नाहीत. २९ टक्के विद्यार्थ्यांना एकाग्र होण्यात अडचणी येतात. ऑनलाइन वर्गामुळे सामाजिक संवाद होत नसल्याचे ३९ टक्के विद्यार्थ्यांना वाटते. तणाव काळात ३९ टक्के विद्यार्थी आशावादी असतात.
‘एनसीईआरटी’च्या मनोदर्पण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले आहेत. त्यानुसार देशभरातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील सहावी ते बारावीच्या ३ लाख ७९ हजार विद्यार्थ्यांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला.
योग, चिंतन आणि प्रयोगवहीचा उपयोग..
ताणाला सामोरे जाण्यासाठी आणि ज्या पद्धतीने विचार करतात त्यापासून दूर जाण्यासाठी विद्यार्थी योग आणि चिंतन, प्रयोगवही लिहिण्याचा उपयोग करत असल्याचेही सर्वेक्षणातून दिसून आले.
मित्र-मैत्रिणींचा आधार..
माध्यमिक विद्यार्थ्यांपेक्षा उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिगत आणि शालेय जीवनातील समाधान कमी होत असल्याचे दिसून आले. माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना स्वओळखीतील अडचणी, नात्यांविषयी संवेदनशीलता वाढणे, ताण, दहावीच्या परीक्षेचे दडपण. अस्वस्थता, भविष्यातील प्रवेशांविषयीची अनिश्चितता जाणवते. तसेच त्यांना एकाग्र होण्यात अडचणी येतात. ते त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आधी मित्र-मैत्रिणींची निवड करतात, त्यानंतर पालकांशी बोलतात असे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.