‘ई- पीक’ पाहणीमुळे अचूक माहिती -जयंत पाटील
सांगली |
‘ई- पीक’ पाहणी उपक्रमामुळे वस्तुनिष्ठ व अचूक माहिती मिळाल्याने धोरणात्मक बाबींमध्येही अचूकता येईल. त्यामुळे या उपक्रमात सुशिक्षित शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर पुढाकार घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्ह्यचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. पालकमंत्री पाटील यांनी पेठ येथील शेतकरी शिवाजी बापू माळी यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी संपत खिलारी, तहसीलदार राजेंद्र सबनीस, तलाठी, शेतकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पाटील यांनी या नव्या तंत्राचा वापर करताना काही अडचणी येतात का याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्यावतीने सुरू असलेल्या ई-पीक पाहणी अॅपचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक देत त्यांना या उपक्रमाचे महत्त्व सांगितले. या अॅपवर नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना शासनाकडून दिली जाणारी मदत तत्काळ संबंधितांकडे पाठविणे सोयीचे होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. ई-पीक नोंदणी अॅपबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत असताना पालकमंत्री जयंत पाटील.