जतमधील ६५ गावांना कर्नाटकच्या पाण्याचा आधार! सामंजस्य करार हवा
सांगली – मागील दोन वर्षांपासून दुष्काळाच्या गंभीर समस्येमुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाण्याची इच्छा दर्शविलेल्या जत तालुक्यातील ६५ गावांना कर्नाटकातील कृष्णा नदीवरील ‘तुबची बबलेश्वर’ योजनेच्या पाण्याचा आधार मिळत आहे. त्यामुळेच यंदाही या गावांचा पाणीप्रश्न तात्पुरता मिटला आहे. पण प्रत्यक्षात नैसर्गिकरित्या जादा साठ्यातील हे पाणी ओव्हरफ्लो होऊन या दुष्काळी भागात दाखल झाले असले तरी जतच्या या ६५ गावांची कायमची तहान भागविण्यासाठी या दोन्ही राज्यात अधिकृतपणे दोन्ही द्विपक्षीय सामंजस्य करार केला जावा अशी मागणी आता जनतेच्या माध्यमातून काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांनी केली आहे. विशेष म्हणजे तसा करार झाल्यास महाराष्ट्र सरकारचे टॅंकरसाठी दरवर्षी खर्च होणारे १३ ते १७ कोटी रुपये वाचू शकतील.
महाराष्ट्रातून दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या बदल्यात कर्नाटकातून हे पाणी घेतल्यास दुष्काळी जत तालुक्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येऊ शकतो. कारण तालुक्यासाठी असलेली म्हैसाळ योजना अद्याप पूर्ण नसल्याने इथल्या ६५ गावांचा पाणीप्रश्न भिजत पडला आहे. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी वारणेचे ६ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला असला तरी हे निव्वळ कागदोपत्री आहे. सध्या कर्नाटकातील पाण्यामुळे ३० ते ३ गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. या पाण्यामुळे मोटेवाडी, तिकोडी १ व २, भिवर्गी आणि सिद्धनाथ तलाव भरले आहेत पण ही परिस्थिती कायम राहण्यासाठी दोन्ही राज्यात सामंजस्य करार होणे गरजेचे असल्याचा पुनरुच्चार आमदार विक्रम सावंत यांनी केला आहे.