राजर्षी शाहू हे शोषित, पीडित, कष्टकरी कामगारांचे कैवारी – काशिनाथ नखाते
पिंपरी / महाईन्यूज
छत्रपती शाहू महाराज हे समाज परिवर्तनाची जनक असून त्यांनी स्वतःला शेतकरी, मजूर कष्टकरी म्हणून घेण्यात धन्यता मानले आहेत. हाताला काम, घामाला दाम ही संकल्पना त्याच बरोबर कामगारांना होणा-या इजा, मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न केले त्याचबरोबर त्यांना विविध प्रकारचे संरक्षण देण्यामध्ये राजर्षी शाहू महाराज स्वतः लक्ष देऊन त्यासाठी कृतिशील आदर्श घालून देणारे राजे होते आणि त्यांनी घालून दिलेल्या अनेक आदर्श आज ही समाजाच्या उपयोगी पडतात, असे मत कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
वर्किंग पिपल्स चार्टर, कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त चिंचवड येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रदेश संघटक अनिल बारवकर, उपाध्यक्ष भास्कर राठोड, राजेश माने, सिद्धनाथ देशमुख, महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार, वृषाली पाटणे, मनिषा राउत, अर्चना कांबले, सुमन अहिरे, अंजना गायकवाड़, रोहिणी माने, नम्रता शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी नखाते म्हणाले “१८९६ च्या दुष्काळामध्ये ७५ मैलांचे रस्ते करून राजर्षी यानी रोजगार हमी योजना अंमलात आणुन राबणाऱ्या हातांना काम मिळवून दिले, कष्टकरी कामगारांच्या मुलांना सांभाळण्यासाठी शिशु गृहांची निर्मिती केली. परळ मुंबई येथील कामगार हितवर्धक सभेचे अध्यक्षस्थानाहुंन राजर्षी शाहू यांनी अत्यंत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. भांडवलदारांची मजूरदार लोकावर बेसुमार सत्ता बदलून टाकण्यासाठी आता कामगारांनी, मजुरांनी आपले संघ बनवले पाहिजेत, इंग्लंडप्रमाणे मजुरांचे आपल्याइथे संघ झाले पाहिजेत. सर्वास हक्क काय आहेत, आपले अधिकार कळाले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले”
राजर्षी शाहू महाराज हे लोक कल्याणकारी राजे होते. कष्टकरी कामगारांबद्दल अत्यंत आपुलकीने ते वागायचे आणि त्यांना लाभदायक भूमिका ठेवायचे. कामगारांच्या चळवळीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होताना दिसून आलेले आहेत. अशा राजर्षी शाहू महाराजांच्या कृतीचा आपण आदर करू आणि येणाऱ्या कालावधीमध्ये कष्टकरी कामगारांच्या हिताचे निर्णय घेऊ. केंद्र सरकारच्या श्रमविरोधी, कामगार विरोधी कायदा रद्द करण्यासाठी आपला अविरत संघर्ष चालू ठेवू, असे ही नखाते यावेळी म्हणाले.
प्रस्ताविक जयंत कदम यानी केले. तर, आभार राणी माने यानी मानले.