27 गावांची सुपारी घेऊनच आयुक्त केडीएमसीत दाखल झाले, भाजप नेते मोरेश्वर भोईर यांचा घणाघात
ठाणे: कल्याण-डोंबिलवी महापालिकेतील (केडीएमसी) 27 गावांपैकी 18 गावांमधील 13 नगरसेवकांची पदे नुकतेच रद्द करण्यात आलेले आहेत. त्यानंतर आता महापालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी महापालिकेच्या निधीतून 18 गावांमध्ये सुरु असलेली विकासकामे थांबवण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे भाजप नेते मोरेश्वर भोईर आक्रमक झालेले आहेत.
“आयुक्त विजय सुर्यवंशी 27 गावांची सुपारी घेऊनच महापालिकेत दाखल झाले आहेत”, असा घणाघात मोरेश्वर भोईर यांनी केलेला. 27 गावांपैकी ज्या 18 गावांमधील 13 नगरसेवकांचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलेलं आहे, त्यामध्ये मोरेश्वर भोईर यांचादेखील समावेश आहे. त्यामुळे त्यांनी महापालिका आयुक्तांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. केडीएमसीतील 27 गावांपैकी 18 गावे केडीएमसीतून वगळण्यात आले आहेत. या गावांची कल्याण उपनगर नररपरिषद स्थापन केली जाणार आहे. या गावांमधील 13 नगरसेवकांची पदे रद्द करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी गेल्या आठवड्यात घेतलेला आहे. या निर्णयाविरोधात मोरेश्वर भोईर यांनी हाय कोर्टात याचिका दाखल केलेली आहे.