धक्कादायक! करोनामुळे सिंहाचा मृत्यू
- चेन्नईतील घटनेनंतर देशातील व्याघ्र प्रकल्प बंद
नवी दिल्ली |
चेन्नईतील वंदलूर प्राणिसंग्रहालयात करोना संसर्गामुळे एका सिंहाचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. त्या पार्श्वभूमीवर प्राणिसंग्रहालयातील इतरही सिंहांची चाचणी केली असता ते बाधित आढळले. देशातील अन्य व्याघ्र प्रकल्पांतही करोना संक्रमणाची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने पुढील आदेशापर्यंत देशभरातील सर्व व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेतील प्राणिसंग्रहालयात करोनाचा पहिला बळी गेल्यानंतर भारतातही सिंहाचा मृत्यू झाला होता.
आता चेन्नईतील वंदलूर प्राणिसंग्रहालयात करोनाच्या संसर्गामुळे सिंहाचा मृत्यू झाला. करोनाचा संसर्ग माणसांमधून प्राण्यांमध्ये होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पर्यटन सुरू केल्यास माणसांकडून वाघांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर भारतातील सर्व व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वन्यजीवरक्षकांनी व्याघ्र प्रकल्प बंद ठेवण्याच्या प्राधिकरणाच्या निर्णयाचे पालन करावे, अशा सूचना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे उपमहानिरीक्षक राजेंद्र गरवाड यांनी दिल्या आहेत.