मराठा आरक्षण : तुम्ही निवडून दिलेल्या आमदार आणि खासदारांना घराबाहेर पडू देऊ नका – उदयनराजे
मुंबई – मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ‘सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा २०१८’ सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने बुधवारी रद्दबातल ठरवला. ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घटनाबाह्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर खासदार उदनराजे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना अडवून याचा जाब विचारा, असं त्यांनी आवाहन केलं आहे.
उदयनराजे यांनी म्हटलं आहे की, “आमचं म्हणणं आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल यात कुठल्याही जाती धर्माचे असतील तर ते त्यांना लागू होतं ना? का मराठा सोडून सर्वांना लागू करताय व मराठ्यांना बाजूला करत आहात. कोण सहन करणार आहे? जरी हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असला, तरी राज्य शासनाने आता जे आहे त्यांना आमदार व खासदार म्हणून निवडून दिलं आहे, त्यांची ही नैतिक जबाबदारी नाही का ? विविध पक्षातील जे ज्येष्ठ लोकं आहेत, ते का त्यावर भाष्य करत नाहीत ? का त्यांची अजूनपर्यंत यावर एकही प्रतिक्रिया आलेली नाही ? लोकं म्हणतात आम्ही आंदोलन करू, मी म्हणालो आंदोलन करू नका, तुमच्या भागातील जे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून दिलेले आहेत, आमदार असतील नाहीतर खासदार कुणी असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, घ्या समोर त्यांना अडवा, घरातून बाहेर पडू देऊ नका, उत्तर द्यायला लावा त्यांना बोलतं करा, काय केलं तुम्ही असा जाब विचारा.”
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगामार्फत राष्ट्रपतींकडून मराठा आरक्षणाला मान्यता मिळवण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने दाखवला आहे. याबाबत चाचपणी केली जात असून, दोन दिवसांत मराठा आरक्षण उपसमितीची बैठक घेऊन पुढील धोरण ठरविण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे.