पुण्यात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय ?, अजित पवारांनी केलं स्पष्ट
पुणे – मुंबई हायकोर्टाने पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे. पुणे तसंच रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या इतर शहरांमध्ये लॉकडाउन लावण्याची सूचना बुधवारी मुख्यमंत्र्यांना केली. यावेळी मुंबई हायकोर्टाने पुणे पालिकेच्या आयुक्तांनाही खडसावलं आहे. पुण्यात लॉकडाऊन लावण्याबाबत अजित पवार यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.
करोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार पुण्यात होते. यावेळी बैठकीत लॉकडाउनवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “काही लोकप्रतनिधींनी लॉकडाउन करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे. सकाळी काही दुकानं उघडी असतात. लोक वेगवेगळी कारणं देतात त्यामुळे पोलिसांची अडचण होते. पण आत्ता आहे तशाच पद्धतीने चालू ठेवून कडक निर्बंध करावेत अशा सूचना दिल्या आहेत. कारण नसताना बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी करता आली तर निकाल चांगला मिळेल,” असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
पुण्यात रुग्ण थोडे कमी झाले आहेत. हायकोर्टाने सरकारला पुण्यात कडक लॉकडाउन केलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. मला त्यासंदर्भात बोलायचं नाही, असं सांगत अजित पवारांनी भाष्य करण्यास नकार दिला. हायकोर्टाच्या सूचनेसंबंधी राज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील असं ते म्हणाले. दुसऱ्या लाटेत जी धावपळ करावी लागली ती वेळ तिसऱ्या लाटेत येऊ नये. यासाठी ज्या काही पायाभूत सुविधा उभ्या करण्याची गरज आहे. ते काम हातात घेतलं आहे, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. फायर ऑडिट तसंच ऑक्सिजनचं ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जे बारकावे लक्षात आले त्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.
“१८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस देण्याचं सरकारच्या वतीने ठरलं होतं. पुरवठा कमी असल्याने अडचण निर्माण होत आहे. लस देणाऱ्यांना आणि नागरिकांनाही त्रास होत आहे. मी येथे आल्यावर अदर पूनावाला यांना फोन लावला. अजून १० ते १२ दिवस ते परदेशात असतील असं सांगण्यात आलं आहे. तेथील क्रमांक मिळवून संपर्क साधण्याचा प्रयत्न असेल,” असं अजित पवार यांनी सांगितलं.
“४५ वरील वयोगटातील नगरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिली लस घेतल्यानंतर दुसरी लस मिळण्यास उशीर होत असल्याने काही नागरिकांमध्ये अस्वस्थात निर्माण झाली आहे. यासंबंधी आम्ही केंद्र सरकारशी बोलणार आहोत. मुंबईला गेल्यानंतर मी सर्वांशी बोलणार असून दुसरा डोस वेळेत देण्याची गरज आहे त्याबद्दल चर्चा करणार आहे. विलंब होऊ नये यासाठी विचार करत आहोत,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली. बाकीच्या वर्गाला देणाऱ्या लसींसाठी परदेशातील लसींना परवानगी दिली पाहिजे. सर्वांसाठी एकच दर असावा, आम्ही अदर पूनावाला यांच्याशी चर्चा करु असंही अजित पवार यांनी सांगितलं. आपलं लसीकरण करण्याआधीच दुसऱ्या देशांना पाठवली हा चुकीचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला असा संतापही यावेळी त्यांनी व्यक्त केला.