भाजप नगरसेवकांमधील भांडण म्हणजे बोका-मांजरीचा वाद; भापकर यांची टिका
पिंपरी – इंद्रायणीनगरमधील शंभर कोटींच्या रस्त्यावरून महापालिका सभेत सत्ताधारी भाजपच्या दोन गटांतील ऐकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप टोकाला गेल्याने भाजपच्या नगरसेवकांचे भांडण म्हणजे बोका-मांजरीचा वाद असल्याची उपरोधित टिका माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.
यासंदर्भात भापकर यांनी प्रसिध्दीस पत्रक दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेच्या शुक्रवारी (दि. २२) झालेल्या महासभेत स्थायी समितीच्या तत्कालीन सभापतींनी कामांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता व तरतुदी वर्गीकरणाचा विषय घेऊन टक्केवारीचे आरोप केले. त्यावर विद्यमान स्थायी समिती सदस्य विलास मडीगेरी यांनी त्याचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला. माजी सभापतीच्या कार्यकाळात कचरा वहनाचा ठेका उत्तर भागासाठी में. बी.व्ही.जी.इंडिया लि. ला देण्यात आला होता. में.बी.व्ही.जी.इंडिया लि. कंपनीने १ हजार ८५० रुपये प्रतिदिन प्रतिटन असा दर नमुद केला होता. तर, त्याच भागासाठी ए. जी. एन्व्हायरो इंफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. या ठेकेदाराने २ हजार ३८० रुपये प्रतिदिन प्रतिटन भरला होता.
दक्षिण भागातील ए.जी.एन्व्हायरो इंफ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. या ठेकेदाराला कचरा वहनाचे काम देण्यात आले. तर, दक्षिण भागासाठी ए.जी.एन्व्हायरो इंफ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. ठेकेदाराने २ हजार ३५० रुपये दर प्रतिदिन प्रतिटन भरला होता. या निविदा प्रक्रियेत या दोन ठेकेदारांनी संगनमत करून निविदा भरल्या होत्या. या दोन्ही ठेकेदारांना ८ वर्षासाठी सुमारे ४५० कोटीचा ठेका देण्यात आला होता. परंतु, नवीन स्थायी समिती अस्तित्वात आल्यानंतर या समितीने हे दोन्ही ठेके रद्द करून ८ भागांत काम विभागून देण्याचा निर्णंय घेतला. त्यानंतर हेच काम चार भागांत विभागून देण्याचा निर्णय झाला.
शुक्रवारच्या सभेत विलास मडीगेरी व सदस्यांनी अंदाजपत्रकातील कामातील सुधारीत प्रशासकीय मान्यता तरतूद वर्गीकरण करण्याबाबत महापालिका सभेसमोर विषय आणले. यामध्ये इंद्रायणीनगर प्रभागातील रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचा १०० कोटींचा विषय होता. त्यावर रस्ते सुस्थितीत असताना हा आटापिटा केवळ टक्केवारी व भ्रष्टाचारासाठी चालला आहे. आमचे राजकीय कार्यकीर्द संपवता काय? अशा विषयांना माझा विरोध आहे. असा माजी सभापतींनी थैयथयाट केला. हा सगळा वाद या दोन्ही गटांच्या भ्रष्टाचार व टक्केवारीसाठी आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप खुलेआम गैरव्यवहार, भ्रष्टाचार, टक्केवारीचे राजकारण करत आहे, असा आरोप भापकर यांनी केला आहे.