“राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर आणि ऑक्सिजन ऑडीट करा”
मुंबई – काही दिवसांपुर्वी नाशिक येथे ऑक्सिजन गळती झाली आणि त्यात 22 जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर शुक्रवारी विरारच्या दुर्घटनेत 12 जणांचे जीव गेले. या दोन घटनांमुळे राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. या घटनेनंतर सरकारवर भरपूर टीका केली गेली होती. पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.
नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट करतानाच ऑक्सिजन ऑडीट करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज जिल्हा यंत्रणेला दिले. ऑक्सिजन टॅंकरना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला असून पोलिस संरक्षणात त्याची वाहतूक करावी आणि परस्पर टॅंकर वळवू नयेत, अशा सूचना मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या.
राज्यातील सर्व रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडीट करतानाच आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर घेण्यात यावे जेणेकरून सिलेंडर आणि लिक्विड ऑक्सिजनवरील अवलंबत्व कमी करता येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी पीएसए तंत्रज्ञानावर आधारित ऑक्सिजन प्लांट उभारावेत, असंही त्यांनी सांगितलं.
राज्यात ऑक्सिजन टॅंकरची वाहतूक कुणीही रोखू नये त्यासाठी त्याला रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे. पोलिस संरक्षणात या टॅंकरची वाहतूक करण्यात यावी कुठल्याही प्रकारे ऑक्सिजन टॅंकर वळवण्यात येऊ नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सूचना देण्यात आल्या आहेत.