मुख्यमंत्र्यांकडून विरारमधील दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश
मुंबई– नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना ताजी असतानाच आज मध्यरात्री विरारमधील विजय वल्लभ कोव्हिड सेंटरमध्ये लागलेल्या आगीत १३ कोरोनाबाधितांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवणे व इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. तसेच उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही याप्रकरणी पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
‘विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवणे व इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले’, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत दिली आहे. तसेच ‘उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या खासगी रुग्णालयात अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत’, अशीही माहिती देण्यात आली आहे.