महासभा चालविण्याचे धडे घेण्यासाठी सत्ताधा-यांनी राष्ट्रवादीकडे शिकवणी लावावी- अमित बच्छाव
पिंपरी – सभा तहकुबीवरून राष्ट्रवादीवर बेछूट आरोप करणा-या सत्ताधारी भाजपने मात्र गेल्या काही दिवसांत महासभा तहकुबीचा विक्रम नोंदविला आहे. याचा फटका शहराच्या विकासाला बसला आहे. भाजपला जर महासभा चालविता येत नसेल तर सत्ताधा-यांनी राष्ट्रवादीकडे शिकवनी लावावी, अशी बोचरी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात बच्छाव यांनी म्हटले आहे की, आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असे लौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची महासभा सव्वा वर्षात तब्बल विसवेळा तर मे महिन्यात तिन वेळा तहकुब करून सत्ताधा-यांनी शहराचे मोठे नुकसान केले आहे. दोन-दोन महिने सर्वसाधारण सभा होत नाही. यामुळे विकासकामांना खीळ बसत आहे. मात्र, याचे सत्ताधा-यांना कोणतेही गांभिर्य राहिलेले नाही. सभा तहकूब करुन सत्ताधारी हे महाराष्ट्र शासनाने लोकप्रतिनिधींना बहाल केलेल्या अधिकारांचे हनन करत असल्याचा आरोप त्यांनी केला. महिन्यातून एकदा महासभा होते. त्यामुळे शहरातील विवीध बाबींवर प्रकाश टाकून त्या अनुषंगाने पुढील विकासकामांची आखणी केली जाते. परंतू, सत्ताधा-यांना मुळात त्याचे काही एक घेणे देणे नाही.
महासभा कशी चालवावी? याबाबत सत्ताधा-यांना उमजत नसल्याचे दिसत आहे. या अगोदर कित्येक वर्षे राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार सांभाळला. परंतू, त्यांनी कधिही महासभा अशा प्रकारे तहकुब करून लोकप्रतिनिधी अथवा जनतेला वेठीस धरले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये प्रशासकीय कामे कशी हाताळायची, महासभा कशा पध्दतीने चालवायच्या? याचा पक्षातील नेत्यांना दांडगा अनुभव आहे. त्यामुळे शहर विकासाची गती मंदावू नये, म्हणून सत्ताधा-यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे महासभा चालविण्याची शिकवणी लावावी, असा उपरोधित सल्ला बच्छाव यांनी भाजपच्या पदादिका-यांसह नगरसेवकांना दिला आहे.