वंचितांना शिक्षण देण्याचे कार्य अतुलनीय – खा. अॅड. वंदना चव्हाण
डॉ. पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२०’ प्रदान
पुणे । प्रतिनिधी
‘भारतातील इतर पुढारलेल्या धर्मांच्या तुलनेत मुस्लीम धर्मात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. समाजातील वंचित, मागास, अल्पसंख्य समुदायाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे डॉ पी. ए. इनामदार यांचे कार्य हे अतुलनीय आहे’, असे प्रतिपादन खासदार वंदना चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२०’ कार्यक्रम पार पडला. आझम कॅम्पस येथे झालेल्या कार्यक्रमात खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या प्रसंगी खा.चव्हाण बोलत होत्या. संस्थेचे सचिव डॉ. लतीफ मगदूम अध्यक्ष स्थानी होते.
माजी पोलिस अधिकारी सुरेश खोपडे, बीव्हीजी इंडिया लिमिटेड चे संस्थापक हणमंत गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते जे के सराफ, अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, घटस्फोट रोखण्यासाठी समुपदेशनाचे काम करणारे अॅड. समीर शेख यांना ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’ प्रदान करून गौरविण्यात आले.सन्मान सोहळ्याचे हे बारावे वर्ष होते. हणमंत गायकवाड यांच्या वतीने रवी घाटे यांनी सन्मान स्वीकारला.
डॉ पी. ए. इनामदार यांच्यावरील पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण या वेळी खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ,आझम कॅम्पस परिवारातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता सन्मान’ साठी प्रा.रणजित घोगले, डॉ. जालिस अहमद यांना गौरविण्यात आले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे या सन्मानाचे स्वरूप आहे.
खासदार एड वंदना चव्हाण म्हणाल्या की, आझम कॅम्पस मध्ये मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला जातो. विद्यार्थिनींची वाढती संख्या पाहून समाधान वाटते. ‘मागे पडलेले समुदाय प्रगतीकडे नेण्यासाठी, देशासमोरील प्रश्न सोडविण्यासाठी देशात पोषक वातावरण आणि संसदीय चर्चा आवश्यक आहे. केंद्र सरकार अधिवेशने रद्द करून ही चर्चाच टाळत आहे. या सरकारला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. जर कोणी प्रश्न विचारले तर त्याला देशद्रोही ठरवले जाते’, असेही त्या म्हणाल्या.
माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे म्हणाले, सद्य परिस्थितीत बोलत राहणे आणि प्रश्न विचारात राहणे आवश्यक आहे. चेहरे बदलण्यापेक्षा व्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षणपद्धती कालबाह्य झाली असून तिला पर्याय देणे हे आव्हानात्मक काम असून ‘कुडाची शाळा’ या प्रकल्पातून आम्ही पर्याय देण्याचे काम करीत आहोत’.
नंदिनी जाधव म्हणाल्या,’अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही करावे लागत आहे. शहरी भागातही बुवाबाजी,जात पंचायत आणि कौमार्य चाचणी सारख्या गोष्टी घडत आहे,हे अतिशय चिंताजनक आहे.
जे. के. सराफ, एड समीर शेख, रवी घाटे यांनीही मनोगत व्यक्त केले.
संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक बीडकर यांनी प्रास्ताविक केले. नूरजहान शेख यांनी आभार मानले.