भारत कुठल्याही स्थितीचा सामना करण्यास सज्ज
हैदराबाद – आम्हाला शांतता हवीय, वाद नको. भारत कुठल्याही स्थितीचा सामना करण्यास सज्ज आहे, मोदी सरकार देशाच्या सन्मानाशी तडजोड करणार नाही, अशा शब्दांत संरक्षमंत्री राजनाथ सिंह यांनी आज चीनला इशारा दिला. त्याचबरोबर सीमापार दहशतवाद आणि भारताविरूद्धच्या छुप्या युद्धाला चालना देण्याऱ्या पाकिस्तानवरही राजनाथ यांनी टीका केली. हैदराबादमधील दुंडिगल येथील एअरफोर्स अकॅडेमीतील पदवीदान समारंभात ते बोलत होते.
यावेळी बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले की, पश्चिमेकडून आपला शेजारी देश पाकिस्तान सीमेवर दुष्टकृत्य करत आहे. भारतासोबत चार युद्ध हरल्यानंतरही दहशतवादा आडून पाकिस्तान भारतासोबत छुपं युद्ध छेडतच आहे. मात्र, हे हल्ले परतवून लावणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा मी सत्कार करु इच्छितो. आपल्या देशाचे तुम्ही रक्षणकर्ते आहात हे आमचे नशिब आहे. आपण आपल्या कर्तव्याला न्याय द्याल, असा आम्हाला विश्वास आहे. बदलत्या काळासोबत देशाला असलेले धोके आणि युद्ध रनणीतीमध्येही आता बदल होत आहे, असे निरिक्षणही यावेळी राजनाथ यांनी नोंदवले. ते पुढे म्हणाले की, भारत कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असून एलओसीवर पाकिस्तान तर एलएसीवर चीन या दोन्ही देशांशी भारताचा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे भारताच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवरील आव्हाने देखील आपल्या स्त्रोतांसाठी आव्हान आहे. भाजपाचे सरकार सीमेवर स्त्रोतांची कुठलीही कमी पडू देणार नाही, याची मी तुम्हाला खात्री देतो.