आंदोलनकर्ता शेतकरी पाकिस्तानी नाही, केंद्र सरकारची वागणूक चुकीची – अण्णा हजारे
अहमदनगर – ‘आंदोलन करणारा शेतकरी हा काही पाकिस्तानातून आलेला नाही. त्यामुळे कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला सरकारकडून दिली जाणारी वागणूक ही चुकीचीच आहे. निवडणुका आल्या की शेतकऱ्यांच्या शेतावर त्यांच्या बांधावर, घरी तुम्ही मत मागायला जाता. मग त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांच्याशी सरकार चर्चा का करत नाही?’, असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे.
कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. तर शेतकऱ्यांसोबत केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर अण्णा हजारेंनीं केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
अण्णा हजारे म्हणाले, दिल्ली येथे शेतकऱ्यांवर पाण्याचे फव्वारे चालवले जात आहे. त्यात एक शेतकरी शहीद देखील झाला आहे. असं असलं तरी आज शेतकरी संयमाने आंदोलन करत आहे. उद्या जर हिंसा भडकली तर त्याला जबाबदार कोण?’ असा सवाल देखील अण्णा हजारे यांनी यावेळी उपस्थितीत करत सरकारला चांगलेच धारेवर धरले .
‘आज अनेक दिवसांपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतं आहे. सरकार आणि शेतकऱ्यांची आजची स्थिती पाहिली तर भारत विरूध्द पाकिस्तान सारखी झाली आहे. हे चित्र अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतावर त्यांच्या घरावर निवडणुकीवेळी मत मागायला जाता त्याप्रमाणेच त्यांच्याशी सरकारने चर्चा करायला हवी.’ अशी प्रतिक्रिया देत दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला माझा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे मतं अण्णा हजारेंनीं व्यक्त केलं आहे.
सीमा सुरक्षा केली अधिक बळकट
निषेध मोर्चाचा एक भाग म्हणून सिंधू सीमेवर पोहोचलेल्या शेतकर्यांच्या गटाला पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अश्रुधुराचे गोळे वापरले होते. तसेच आंदोलनकारी शेतकऱ्यांवर तुफान लाठीहल्ला करण्यात आला होता. दिल्लीला हरियाणाशी जोडणाऱ्या सीमारेषेवर अश्रू धुराच्या गोळ्यांच्या वापर करण्यात आला होता. सीमेवर सुरक्षा अधिक बळकट करण्यात आली असून वाळूने भरलेल्या ट्रक व पाण्याच्या तोफ्या तैनात केल्या गेल्या होत्या.