दिनेश कार्तिकचा आयपीएल कारकिर्दीचा शेवटचा सामना
आरसीबीच्या खेळाडूंनी कार्तिकला गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मान
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात पार पडला, जो विकेटकीपर-फलंदाज दिनेश कार्तिकच्या आयपीएल कारकिर्दीचा शेवटचा सामना होता या सामन्यात आरसीबीच्या खेळाडूंनी कार्तिकला गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मान दिला. आता आरसीबीने अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर कार्तिक संदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये विराट कोहली आणि कार्तिकची पत्नी दीपिका पल्लीकल यांनी कार्तिकबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
दीपिका पल्लीकल म्हणाली…
आरसीबीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिनेशची पत्नी दीपिका म्हणाली, “मला वाटतं जेव्हा ज्या गोष्टी घडायच्या असतात, तेव्हा त्या घडतात. २०१३ साली जेव्हा आम्ही भेटलो होतो, तेव्हा आम्हाला आमचं आयुष्य एकमेकांसोबत घालवायचं होतं. मला वाटतं सगळं काही ठीक चाललंय. एक गोष्ट मी त्याच्याकडून खरोखरच शिकले की ती म्हणजे जेव्हा तो चांगली कामगिरी करत नाही तेव्हा त्याला संघातून वगळले जाते. तो दोन-तीन दिवस शांत होतो आणि मग त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करू लागतो.”
पुढे ती म्हणाली, “मला वाटतं त्याच्या जागी दुसरं कुणी असतं तर अनेकांनी खूप आधीच हार मानली असती. मी एक ॲथलीट आहे आणि जेव्हा त्याच्या कारकिर्दीत त्याला वेगवेगळ्या टप्प्यातून जाताना जेव्हा पाहिलं तेव्हा वाटलं की त्याच्या जागी मी असते तर मी नक्कीच हार मानली असती. पण मला असे वाटते की त्याच्याकडे नेहमी करो या मरो आणि कधीही हार न मानण्याचीवृत्ती कायम राहिली.”
विराट कार्तिकबद्दल म्हणाला…
विराट कार्तिकबद्दल म्हणाला की, “मी त्याच्यासोबत मैदानाबाहेर अनेक चांगल्या आणि अप्रतिम चर्चा केल्या आहेत. तो खूप बुद्धिमान व्यक्ती आहे आणि त्याला क्रिकेटशिवाय इतर अनेक गोष्टींची चांगली माहिती आहे. २००९ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जेव्हा मी त्याला पहिल्यांदा भेटलो, तेव्हा तो मला खूप गोंधळलेला आणि हायपरएक्टिव्ह व्यक्ती वाटत होता. त्या काळात मी त्याच्यासोबत रूम शेअर केली होती. जेव्हा मी कार्तिकला खेळताना पाहतो, तेव्हा तो मला तांत्रिकदृष्ट्या खूप चांगला खेळाडू वाटतो. तुम्ही त्याला कोणतीही भूमिका द्या, तो त्यात पूर्णपणे उतरतो. मी त्याला २०१३ च्या आयपीएल हंगामात खेळताना पाहिले होते, जेव्हा त्याने ६०० हून अधिक धावा केल्या होत्या”.
विराटला त्याकाळात दिला कार्तिकने पाठिंबा
कोहली पुढे म्हणाला की, “२०२२ सालच्या आयपीएल हंगामात जेव्हा मी चांगला खेळत नव्हतो, त्यावेळी कार्तिकने माझ्याशी २ ते ३ वेळा चर्चा केली होती. त्याने मला प्रामाणिकपणे सांगितले की, त्याने माझ्याबद्दल कितीतरी चांगल्या गोष्टी पाहिल्या आहेत आणि त्यावेळी कदाचित मी चांगल्या प्रकारे गोष्टींकडे पाहू शकत नव्हतो आणि म्हणून त्याने स्वतः माझ्याकडे येऊन माझ्याशी याबाबत चर्चा केली. मला त्याचा प्रामाणिकपणा आणि धैर्य आवडते आणि हेच एक कारण आहे की मी नेहमीच त्याच्यासोबत असतो तर,आगामी काळात कार्तिक आरसीबी फ्रँचायझीशी जोडला जाईल, अशी आशा मी व्यक्त करतो”.