भाजपचा नियोजन शून्य कारभार; पिंपरी-चिंचवडकर पाण्यापासून वंचित

- भाजपचे दोन्ही आमदार, महापाैरांसह विरोधकांची चिडीचूप भूमिका
- दिवसाआड पाणीपूरवठा कायम राहणार, रामदास तांबेची ‘काळ्या दगडावर पांढरी रेघ‘
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नियोजन शून्य कारभारामुळे गेल्या दीड वर्षापासून 25 लाख नागरिक दिवसाआड पाणी पूरवठ्याच्या यातना भोगत आहेत. परतीच्या पावसाने पवना धरण शंभर टक्के भरले. पण पाणी पूरवठा विभागातील अधिका-यांच्या आडमुठ्या भूमिकेने दिवसाआड पाणी पुरवठा नागरिकांच्या माथी मारला आहे. याकडे भाजपचे कारभारी असलेले दोन्ही आमदार, महापाैर, सत्तारुढ पक्षनेत्यांनी चिडीचूप भूमिका घेतली आहे. विशेषता: राष्ट्रवादीसह शिवसेना, काॅंग्रेस, मनसेसह सामाजिक संघटनांनी देखील मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा अधिका-यांचा “हम करेसो कायदा” अशी स्थिती निर्माण झालेली आहे.
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांनी शहरातील विस्कळीत होणा-या पाणीपुरवठ्यावर रामबाण इलाज शोधून काढला आहे. त्या अधिका-यांच्या म्हणण्यानूसार दिवसाआड पण एकच वेळ पाणी पूरवठा केल्याने नागरिकांच्या तक्रारी कमी झालेल्या आहे. परंतू, आजही शहराच्या कित्येक भागात पुरेशा प्रमाणात व कमी दाबाने पाणीपुरवठा होत नाही. काही भागात सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याच्या नागरिकांना तक्रारी कायम आहे.
दिवसाआड पाणी दिल्याने तक्रारी कमी होवून सर्वांना पुरेशा प्रमाणात पाणी जातेय, हा जावई शोध पाणी पुरवठा अधिका-यांनी शोधून काढला आहे. त्यावर सत्ताधा-यासह विरोधकांनी चिडीचूप भूमिका घेतल्या आहेत. आजही भोसरी, चिंचवड भागात “टॅंकर लॉबी’च्या कार्यरत आहे. सोसायट्यांना पाणी मिळत नसल्याने अव्वाच्या सव्वा रुपये देवून टॅंकरने पाणी घ्यावे लागत आहे.
महापालिकेने केलेली दिवसाआड पाणीकपात धरण शंभर टक्के होवूनही मागे घेण्याची तयारी सुरू केलेली नाही. उपमहापौर तुषार हिंगे यांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना केलेल्या प्रश्नावर देखील अधिका-यांनी चालढकल भूमिका घेतलेली आहे. तसेच राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेसनेही पाणी कपात मागे घेण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे पाणीकपात कधी मागे घेणार? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
आयुक्तांचे पाणीपुरवठा विभागावर नाही नियंत्रण?
पवना धरणात शंभर टक्के पाणीसाठा असताना महापालिकेने पाणी कपातीचा निर्णय मागे घेतलेला नाही. शहराला दररोज पाणी देण्याऐवजी दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय, याकडे सत्ताधा-यांचे दुर्लक्ष होत आहे. नियोजनशून्य कारभारामुळे पाणी पुरवठा विभागाकडून नागरिकांना त्रास दिला जात आहे. मात्र, पाणी बचतीच्या उद्देशाने घेतलेला पाणी कपातीचा निर्णय पहिल्या दिवसापासूनच वादाच्या भोव-यात सापडला आहे. पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांच्या ढिसाळ नियोजनामुळे विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डिकर यांचे पाणीपुरवठा विभागावर नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.





