तबलिघी जमातसाठी गेलेल्यांमुळे कोरोनाचा फैलाव हा मीडियाचा प्रपोगंडा; औरंगाबाद खंडपीठाचे ताशेरे
औरंगाबाद | दिल्लीतील तबलिघी जमातसाठी गेलेल्यांनीच देशात कोरोनाचा फैलाव केला, असा अकारण प्रपोगंडा मीडियाने केल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ओढले असून महाराष्ट्र पोलिसांनी परदेशी तबलिघींविरुद्ध नोंदवलेला एफआयआर रद्द केला आहे. तबलिघींविरूद्ध केलेल्या कारवाईत द्वेषाचा वास येतो, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे.
दिल्लीतील मकरझला आलेल्या परदेशी तबलिघींविरुद्ध प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने मोठा प्रपोगंडा केला आणि हे परदेशी तबलिघीच भारतात कोरोना पसरण्यास कारणीभूत असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या परदेशी तबलिघींचा अक्षरशः छळवाद मांडण्यात आला, असेही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम.जी. शेवलीकर यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.
दिल्लीच्या निझामुद्दीन मरकझला गेलेल्या अनेक परदेशी तबलिघींबरोबरच महाराष्ट्र पोलिसांनी मरकझला गेलेल्या 35 जणांविरुद्ध भादंवि, साथरोग नियंत्रण कायदा, महाराष्ट्र पोलिस कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि परदेशी नागरिक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
मरकझला हजेरी लावून त्यांनी टुरिस्ट व्हिसाचे उल्लंघन केल्याचा आरोपही परदेशी तबलिघींवर ठेवण्यात आला होता. या 35 जणांनी महाराष्ट्र पोलिसांच्या कारवाईला खंडपीठात आव्हान दिले होते. त्यांच्याविरुद्ध सकृतदर्शनी कोणताही पुरावा नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.