कोलकत्तामध्ये विमानाच्या धावपट्टीसाठी मस्जीद हटवण्यावरून नव्या वादाला टेकऑफ
![Ban on flights from England to India - Ministry of Civil Aviation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/airportjpg.jpg)
कोलकाता: कोझिकोड विमान दुर्घटनेनंतर AAI सतर्क झालेली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशात सर्वाधिक वापरलं जाणाऱ्या विमानतळांपैकी एक असलेल्या कोलकातास्थित नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दुसऱ्या धावपट्टीच्या बांधकामात मस्जीद अडथळा ठरलेली आहे. या मस्जीदवरून पुन्हा एकदा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
केरळच्या कोझिकोड येथे विमान अपघात झाल्यानंतर विमानतळ प्राधिकरण (एएआय) सतर्क झालेलं आहे. त्यामुळे धावपट्टी तयार करताना सुरक्षेच्या दृष्टीनं काही अंतर ज्यादा सोडणं गरजेचं असतं ज्यामुळे कोणतीही दुर्घटना होणार नाहीय. मात्र ही धावपट्टी तयार केल्यानंतर पुढे अगदी लागूनच मस्जीद येत असल्यानं अंतर सोडण्यासाठी जागा उरत नाहीये. त्यामुळे ही मस्जीद स्थलांतरीत करण्याबाबत विमान प्राधिकरणानं प.बंगालच्या सरकारकडे विनंती केलेली आहे. परंतु सरकारकडून कोणतंही सहकार्य मिळत नसल्याचं AAIचं म्हणणं आहे.
कोलकाता विमानतळावर दुसरी धावपट्टी तयार केल्यानं एका धावपट्टीवर येणाऱ्या विमानांची संख्या कमी करून ती दुसरीकडे वळवता येईल. याशिवाय कोलकाता विमानतळावर मोठ्या विमानांची संख्या वाढत असल्यानं दुसऱ्या धावपट्टीची गरज असल्याचं सांगितलं जात आहे. मस्जीद हटवल्यास ही धावपट्टी 800 ते 900 मीटरपर्यंत वाढवता येऊ शकते. कोझिकोड विमानाच्या दुर्घटनेत मुख्य कारण हेच होतं की धावपट्टीच्या पुढे विमान थांबवण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे धावपट्टीच्या पुढे जाऊन विमान दरीत आदळलं होते. विमानतळ प्रशासनाने बंगाल सरकारकडे अनेक वेळा मस्जीद हटवण्यासाठी मदत मागितली आहे. मस्जीद हटवण्यासाठी सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाहीये.