आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही, त्यांना भेटलेही नाही : रिया चक्रवर्ती
मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या रिया चक्रवर्तीने मोठं वक्तव्य केलं आहे. “आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही तसंच त्यांना कधीही भेटले नाही,” असं रियाने म्हटलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात विरोधकांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केल्यामुळे राजकारण तापलं आहे. अशातच रिया चक्रवर्तीचं वक्तव्य महत्त्वाचं समजलं जात आहे.
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी करायचा की सीबीआयने यासंदर्भातील दाखल याचिकेवरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान विरोधी पक्षाच्या वकिलांनी आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं होतं. तसंच विरोधकांकडूनही सातत्याने आदित्य ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केले जात होता. यावरुन स्वत: आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिकाही मांडली होती. तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आदित्य ठाकरेंचा कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं होतं.
त्यावर आता रियानेच आदित्य ठाकरे यांना ओळखत नसल्याचं सांगितलं. ती म्हणाली की, “मी आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही. त्यांना कधीही भेटले नाही. तसचं कधी फोन वर सुद्धा बोलणं झालं नाही. शिवसेनेचे नेते म्हणून त्यांच्याबद्दल ऐकलं आहे.”