कुटुंबातील सगळ्यांशी चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पार्थ पुण्यात दाखल; उद्याची बैठक होणार काकांच्या घरी
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली. यानंतर आता पार्थ पवार कुटुंबाशी चर्चा करणार असल्याच म्हटलं जात आहे. पार्थ पवार आपले काका श्रीनिवास पवार, अभिजित पवार जयंत पवार तसंच सर्व आत्यांशी बोलून आपली भूमिका आणि निर्णय घेणार आहेत. पार्थ पवार हे आज नातेवाइकांशी चर्चा करण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत, तर पार्थ यांचे वडिल आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेही आज पुण्यात आहेत. पार्थ पवार हे आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक विशेषतः आपले काका यांच्याशी चर्चा करून आपला पुढील निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र या बैठकीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पार्थ पवार यांनी ‘अयोध्येत श्री राम. श्रीराम हे भारतीय अस्थेचे प्रतिक आहे. सांस्कृतिक ओळख आहे. आता अयोध्येत ते शांततेने राहतील’ अशा आशयाचे एक पत्र ट्विट केलं होतं. राम मंदिर आणि एकूणच प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच सावध प्रतिक्रिया व्यक्त करत आला आहे. इतकेच नव्हे तर उजव्या विचारांचे राजकारण टाळत नेहमी सर्वसमावेशक राजकारणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पार्थ पवार यांचे राम मंदिराबाबतचे भाष्य पक्षाच्या चौकटीत बसणारे नव्हते.
तर, दुसऱ्या बाजूला पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली. पार्थ यांची ही मागणीसुद्धा पक्षाची भूमिका नव्हती. त्यामळे पक्षाची भूमिका नसताना आणि त्यातही राज्याचे गृहमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतानाही पार्थ पवार यांनी ही भूमिका मांडली. पार्थ पवार यांच्या दोन्ही भूमिकांमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. त्याचे राजकीय अर्थही काढले जाऊ लागले. मात्र याबाबत जेव्हा शरद पवार यांना विचारण्यात आलं तेव्हा ‘पार्थ पावार हे असमंजस आहेत. त्यांच्या मताला काडीचीही किंमत नाही’, अशा शब्दात शरद पवार यांनी फटकारलं होतं. यामुळे पार्थ पवार दुखावल्याचं म्हटलं जात होत. तसेच त्यानंतर अजित पवार यांनीही मौन पाळलें आहे… या साऱ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये काहीतरी घडत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.