#CoronaVirus: राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९ टक्के, आतापर्यंत १.९४ लाख रुग्ण ठणठणीत बरे
मुंबई : राज्यात कोविड-१९चा प्रादुर्भाव वाढतच आहे. मुंबईत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले तरी ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नवी मुंबई या मोठ्या शहरात कोरोना विषाणूचा फैलाव वाढतच चाललेला आहे. असे असले तरी एक दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ५६ टक्क्यांकडे पोहोचलेला आहे. राज्यात गुरुवारी ६,४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ९४ हजार २५३ झाली आहे. दरम्यान, राज्यात गुरुवारी कोरोनाच्या ९,८९५ नवीन रुग्णांचे निदान झालेले असून सध्या राज्यात १ लाख ४० हजार ०९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ लाख ३७ हजार ७१६ नमुन्यांपैकी ३ लाख ४७ हजार ५०२ नमुने पॉझिटिव्ह (२० टक्के) आलेले आहेत.