‘छत्रपतींच्या वंशजांना मागच्या रांगेत बसवले; भाजप औरंगजेबासारखी वागतेय’
भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभा सदस्यत्त्वाच्या शपथविधीवेळी झालेला वाद ताजा असतानाच आता यामध्ये आणखी नवी भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपल्या निवासस्थानी राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीत उदयनराजे यांना मागच्या रांगेत बसावे लागल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्विट करुन भाजपवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवरायांच्या वंशजांनी केलेल्या घोषणाही चालत नाही. छत्रपतींच्या वंशजांना पुन्हा अतिशय मागच्या रांगेत ठेवून इतिहास पुनर्जीवित केला जातो.शिवरायांच्या आशीर्वादाचे नाव घेत सत्तेवर आलेली भाजपा औरंगजेबासारखे राज्य चालवत असल्याचे सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
तत्पूर्वी संजय राऊत यांनीही या मुद्द्यावरुन भाजपला चांगलेच झोडपले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली-सातारा बंदची अदयाप घोषणा नाही, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.