मराठा आरक्षणावर राजकारण न करता सरकारला साथ द्या; थोरातांचा भाजपला सल्ला
अहमदनगर – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. मराठा आरक्षण टिकवण्याला महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.
आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काँग्रेस किंवा आघाडी सरकार योग्य ती पावले उचलत आहे. त्यामुळे यावर राजकारण करण्यापेक्षा सगळ्यांनी सरकारची मदत करणं अपेक्षित आहे. ज्या वेळेला त्यांचे सरकार होते, त्या वेळेस आम्ही कोणतेही राजकारण केले नाही. प्रत्येक गोष्टीत आमची साथ होती. आता त्यांनीदेखील साथ दिली पाहिजे, अशी इच्छा थोरातांनी व्यक्त केली. कोरोना संकटात शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
तर शेतीमालाचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्याची निर्यातबंदी हे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. शेतकऱ्याच्या कमाईच्या वेळेसच घेतलेला निर्णय चुकीचा आणि निषेधार्ह आहे. हा सर्व निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, असे थोरात म्हणाले. त्याचबरोबर राज्यात कोरोनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाला संपवले पाहिजे. त्यामुळे या मुद्द्यावर राजकारण करण्याची गरज नाही. जिथे लोक एकत्र येतात तिथे संसर्ग वाढतो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्याबाबत निर्णय घेताना मोठा विचार करावा लागेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.