#Coronolockdown:भिवंडीतून स्थलांतरित कामगारांसाठी उत्तरप्रदेशात जाणारी विशेष ट्रेन रवाना
भिवंडी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात सुरुवातीला 40 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यानंतर आता हा लॉकडाऊनची मुदतवाढ करत 17 मेपर्यंत लॉकडाऊन ठेवलं जाणार आहे. यामुळे भिवंडीमध्ये परराज्यातील हजारो मजूर कामगार अडकून पडले. एकीकडे काम बंद आणि दुसरीकडे हातातला पैसा संपल्यानंतर या प्रत्येकाला गावी जाण्याची ओढ लागली. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने भिवंडीतून गोरखपूर उत्तरप्रदेशात 1200 कामगारांना घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली.
या विशेष रेल्वेने प्रवास करणाऱ्या स्थलांतरित कामगारांना रेल्वे जिल्हाधिकारी, पोलीस, महसूल, रेल्वे अधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवून हात उंचावून शुभेच्छा दिल्या.
गेल्या दोन दिवसांपासून महानगरपालिका क्षेत्रात परराज्यात जाणाऱ्या कामगारांची नोंद सुरू होती. त्यातच शनिवारी दुपारी अचानक भिवंडी रोड रेल्वे स्टेशन येथून गोरखपूर येथे जाणाऱ्या विशेष रेल्वेची घोषणा करण्यात आली. ही माहिती भिवंडी शहरात वार्यासारखी पसरली. त्यानंतर नागरिकांचा लोंढा रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाला असतानाच या प्रवाशांचे नियोजन करण्याची जबाबदारी भिवंडी पोलीस परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्यावर सोपवली.
त्यांनी परिमंडळ क्षेत्रातील सहा पोलीस स्टेशन अंतर्गत गोरखपूर येथे जाणाऱ्या नागरिकांना एकत्रित होण्यासाठी ठिकाण जाहीर केली. त्याठिकाणी गोरखपूर जिल्ह्यातील आधार कार्ड व प्रवासाच्या तिकिटाचे आठशे रुपये घेऊन बोलावण्यात आले. सायंकाळी अंजुरफाटा या प्रवासाच्या तिकिटाचे पैसे जमा करण्यात आले. त्यानंतर या सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी महानगरपालिका आरोग्य विभागाकडून केली गेली. त्यानंतर त्यांना पुढील प्रवासाची संधी देण्यात आली.
तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशास जेवणाचे दोन डबे, पिण्याच्या पाण्याच्या तीन बॉटल, बिस्किट अशा प्रवासादरम्यान लागणाऱ्या वस्तूही महसूल विभागाने दिल्या.
ठाणे जिल्ह्यातील हा पहिला प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर पुढील दिवसांमध्ये इतर जिल्ह्यातल्या नागरिकांना सुद्धा पाठवण्यात येणार आहे.
दरम्यान सकाळी गोरखपूर येथे जाणाऱ्या रेल्वेची माहिती शहरात पसरताच गोरखपूर येथील कामगारांचे लोंढे रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाले होते. परंतु पोलिसांकडून ठिकठिकाणी त्यांना थांबवून पोलीस स्टेशननिहाय बनवलेल्या एकत्रित होण्याच्या ठिकाणी जमा होण्यासाठी माघारी धाडले. या विशेष रेल्वे सोडण्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.





