पुण्यातील कामगारांना मिळणार पूर्ण पगार, टाटा ग्रुपकडून दिलासा
पुणे – महाराष्ट्रात वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे टाटा ग्रुपने पुण्यातील प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील प्लांटमध्ये सोमवारी 23 मार्चला सर्व प्रकारची काम थांबवण्यात येणार आहेत. त्यानंतर 24 मार्चपासून हा प्लांट बंद करण्यात येणार आहे. 31 मार्चपर्यंत हा निर्णय लागू असणार आहे, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
पुण्यातील टाटा ग्रुपचा प्लांट बंद करण्यात येणार असल्यामुळे कर्मचारी काहीसे चिंतेत होते. मात्र आता कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जे कर्मचारी काम करू शकणार नाहीत अशा अस्थायी आणि डेली वर्कर्सला कंपनीकडून पूर्ण पगार देण्यात येईल, अशी घोषणा टाटा ग्रुपने केली आहे.
महाराष्ट्रातील आकडा वाढला!
कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बाधित रूग्णांची संख्यात आता 63 वर पोहोचली आहे.