करोनोची भिती : राष्ट्रवादीने सर्व सभा, बैठका केल्या रद्द
मुंबई |महाईन्यूज|
महाराष्ट्रात करोनाचे संकट गडद होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने खबरदारीचे पाऊल उचलत पक्षाचे सर्व प्रकारचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तूर्त पक्षाकडून कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम व जाहीर सभा घेतली जाणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज स्पष्ट केले.
महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत राज्यात करोनाचे ११ रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची आढावा बैठक घेऊन अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. लोकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. त्यासोबतच सर्व यंत्रणांसाठी दिशानिर्देशही जारी करण्यात आलेले आहेत. या अनुशंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस करोना संकट दूर होईपर्यंत कोणतीही जाहीर सभा वा जाहीर मेळावा आयोजित करणार नाही. याबाबत पक्षाने निर्णयच घेतला आहे, असे नमूद करतानाच अन्य पक्षांनीही हे पाऊल उचलावे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी ते आवश्यक आहे, असे नवाब मलिक यांनी नमूद केले. सरकारने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करत आम्ही हा निर्णय घेतला आहे, असेही मलिक पुढे म्हणाले.