न्या. लोया मृत्यूप्रकरणी फेरचौकशी लावण्यासाठी अपना वतन करणार अन्नत्याग सत्यागृह
- संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
न्यायमूर्ती लोया प्रकरणी अपना वतन संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. न्या. लोया यांच्या संशयित मृत्यूप्रकरणी फेरचौकशी करण्यासाठी अन्नत्याग सत्याग्रह करण्याबाबत शिष्टमंडळाने आव्हाड यांना निवेदन दिले.
न्या. ब्रिजगोपाल लोया यांच्या संशयित मृत्यूची फेरचौकशी करावी अशी मागणी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. फेरचौकशीसाठी ७ मार्चपासून संघटनेच्या वतीने बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह करण्यात येणार आहे. या आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी अपना वतन संघटनेच्या वतीने अनेक राजकीय नेत्यांशी भेटीगाठी व चर्चा करून या आंदोलनात सहभागी होण्याची विनंती केली आहे.
अपना वतन संघटनेच्या वतीने ७ मार्चपासून शहरातील एकूण ५० संघटनांच्या वतीने पिंपरी येथे अन्नत्याग सत्याग्रह करणार आहेत. यासंदर्भात संघटनेच्या वतीने मुंबई येथील मंत्रालयात मुख्यमंत्री, गृहमंत्री यानाही पत्र देण्यात दिले. त्यावेळेस संघटनेच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन या आंदोलनाबाबत चर्चा केली.
अन्नत्याग सत्याग्रहास सहकार्य करण्याबाबत आव्हाड यांच्याकडे विनंती करण्यात आली. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रचंड गर्दी असताना सुद्धा या प्रकरणासाठी आवर्जून वेळ देऊन सकारात्मक प्रतिसाद दिला. न्या. लोया प्रकरण आंदोलनाबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. तसेच, संघटनेच्या वतीने सुरु करण्यात येणाऱ्या आंदोलनास शुभेच्छा दिल्या. अपना वतन संघटनेच्या वतीने हमीद शेख, इम्रान शेख, राज गुंजाळ यांसह अनेक कार्यकर्त्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली.