राज्यात थंडीचं वाढत प्रमाण…तर, मुंबईचे किमान तापमान १८ अंश सेल्सिअस
मुंबई | महाईन्यूज |
मुंबईसह राज्याचे वातावरण ढवळून निघालं आहे. कधी पाऊस, कधी मळभ तर कधी थंडी; अशा तिहेरी बदलाचे वारे वाहत आहेत. त्यात आता हवामान खात्याने राज्याला पावसाचा इशारा दिला आहे. मात्र सध्या मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या किमान तापमानात घट झाल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १८ तर ब्रह्मपुरी येथील किमान तापमान ८.७ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असतानाच दुसरीकडे २९ डिसेंबरला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊसही पडला.कोकण, गोवा आणि मराठवाड्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ तर कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.
मुंबईचा विचार करता गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे किमान तापमान २२ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येत होते. शिवाय प्रदूषणातही सातत्याने भर पडतेय… आता तापमान २२ अंशावरून १८ अंशावर घसरल्याची नोंद हवामान खात्याने केली.मुंबईत २८ आणि २९ डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे.कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, १९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.