पैसे न भरल्याने रुग्णांवर उपचार टाळले, रुग्णांच्या मृत्यूमुळे डाॅक्टरवर गुन्हा दाखल करा, कुटूंबियाची मागणी
धनश्री रूग्णालयाचा निष्काळजीपणा; दोन महिने उलटूनही पोलिसांकडून कारवाईला चालढकल
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
महिलेच्या छातीत दुखू लागल्याने संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारास दाखल केले होते. रुग्णालय प्रशासनाकडून अगोदर पैसे भरा, त्यानंतर उपचार करु, असे सांगण्यात आले. मात्र, वेळेवर उपचार न मिळाल्याने त्या महिला रुग्णाचा मृत्यू झाला. डाॅक्टर व रुग्णालयातील कर्मचा-यांच्या निष्काळजीपणामुळे महिला रुग्णांचा हकनाक बळी केला. त्यामुळे रुग्णालयाच्या संबंधित डाॅक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अशोक चित्ते यांनी केली. दरम्यान, दोन महिने होवूनही निगडी पोलिसांनी कारवाई न केल्याने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
चिखली येथील घरकुल प्रकल्पातील सह्याद्री सोसायटीत अंबिका अशोक चित्ते राहतात. त्यांच्या अचानक छातीत दुखू लागल्याने संभाजीनगरच्या धनश्री रूग्णालयात 13 ऑक्टोबर 2019 रोजी दाखल करण्यात आले. त्यांना रूग्णालयाने त्याना ताबडतोब दाखल करून घेतले. याप्रसंगी तत्काळ आगाऊ शुल्क भरल्यानंतर उपचार केले जातील, असे रूग्णालयाच्या डॉक्टरांनी रूग्णांच्या नातेवाईकांना सांगितले.
रूग्णांच्या कुटूंबियाकडून सदरील उपचाराची आगाऊ रक्कम भरण्यात येईल, त्यांची आम्ही व्यवस्था करतो. तुम्ही तत्काळ उपचार सुरू करा, अशी डॉक्टरांना विनंती केली. मात्र, त्या रूग्णालय प्रशासनाने अगोदर आगाऊ शुल्क भरा, असा आग्रह कायम धरला. तसेच दुसर्या रूग्णालयात जा, असंही त्यांनी सांगितले नाही, अशी तक्रार रूग्णाचे पती अशोक चित्ते यांनी निगडी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, रूग्णालय निष्काळजीपणामुळे अंबिका चित्ते यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी रूग्णालय व डॉक्टरांच्या विरोधात पोलिसांत 17 ऑक्टोबरला अशोक चित्ते यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणास दोन महिने उलटले आहेत. तरीही अद्याप निगडी पोलिस आणि पिंपरी-चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागाकडून कोणती कारवाई झालेली नाही. दोषी रूग्णालयावर कारवाई करावी, म्हणून सामाजिक कार्यकर्ते राहुल चौधरी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणी चौधरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री, वैद्यकीय मंत्री, पुणे जिल्हाधिकारी व पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे.