देशाचा घसरता जीडीपी हेच सरकारसाठी ‘अच्छे दिन’ आहेत का? – माजी केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम
महाईन्यूज | दिल्ली
आयएनएक्स मीडिया प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना काल जामीन मंजूर झाल्यानंतर ते तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देशाचा घसरता जीडीपी हेच भाजपासाठी ‘अच्छे दिन’ असल्याची टीका त्यांनी केली आहे.
चिदंबरम म्हणाले, अर्थव्यवस्थेबाबत मोदी सरकार दिशाहीन आहे. देशाचा जीडीपी सातत्याने घसरत आहे. मात्र, यासाठी कारणीभूत ठरलेल्या आपल्या चुका स्विकारण्यापेक्षा त्यावर अजब तर्क लढवले जात आहेत. देशाचा घसरता जीडीपी हेच भाजपासाठी ‘अच्छे दिन’ असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. मागील विकास दराचा उल्लेख करताना ५ टक्के विकास दर देखील विश्वासदर्शक नसल्याचे ते म्हणाले आहेत. मोदी सरकारमध्ये अर्थव्यवस्था सांभाळण्याची क्षमता नाही असे त्यांनी म्हणले आहे. देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्याची क्षमता काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये आहे मात्र देशाला आता यासाठी वाट पहावी लागणार आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.