राज्यात महाशिवआघाडीचे सरकार सत्तेत आल्यास, पुण्याचे पालकमंत्री पुन्हा अजित पवार यांची वर्णी लागणार
पुणे |महाईन्यूज|
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांच्या महाशिवआघाडीचे संयुक्त सरकार सत्तेवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याची सुत्रे पुन्हा एकदा अजित पवार यांच्या हाती येणार असून पालकमंत्री त्यांचीच वर्णीय लागण्याची श्कयता आहे.
पुणे जिल्ह्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), आमदार संग्राम थोपटे (काँग्रेस) यांची नावे मंत्री पदासाठी आघाडीवर आहेत. पुणे शहर व जिल्ह्यात सेनेचा एकही आमदार नसल्याने, पक्षवाढीसाठी एक मंत्री देण्याचे सेनेचे धोरण असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ मध्ये झाल्यानंतर त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर सलग १५ म्हणजेच २०१४ पर्यंत आघाडी सरकार सत्तेत होते. या पंधरा वर्षातील तीन महिन्यांचा अल्प काळ उर्वरीत सर्व काळ अजित पवार हे पालकमंत्री होते. भाषणातील एका असंसदीय शब्दामुळे त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या या राजीनामा कालावधीत मुंबईचे सचिन अहिर हे पुण्याचे पालकमंत्री झाले होते. आघाडीचा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने सत्तांतर झाले आणि सत्तांतरानंतर भाजपचे गिरीश बापट जिल्ह्याचे पालकमंत्री झाले.
पुणे शहर, जिल्ह्यात काँग्रेसचे दोनच आमदार आहेत. त्यात भोरचे संग्राम थोपटे आणि पुरंदरचे संजय जगताप यांचा समावेश आहे. जगताप हे पहिल्यांदाच निवडून आले असून थोपटे सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. त्यामुळे ज्येष्ठतेनुसार थोपटे यांचे नाव अग्रक्रमाने राहणार आहे.