लम्पीमुळे जिल्ह्यात २७० जनावरांचा मृत्यू
जिल्ह्यामध्ये लम्पीचा प्रादुर्भाव कमी होत असला, तरी सध्या सक्रिय जनावरांची संख्या ५६४ एवढी आहे. आतापर्यंत २७० जनावारांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. एकूण बाधित जनावरांची संख्या ६५५४ एवढी झाली आहे. ५८४१ बाधित जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत, तर आठ लाख ३२ हजार ९१२ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने इतर जिल्ह्यातून येणाऱ्या जनावरांची संख्या ग्रामीण भागात वाढली आहे. साखर कारखान्यांवर असलेल्या जनावरांसाठी कारखाना प्रशासनाला खबरदारीच्या उपाययोजना घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच स्वतंत्र डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे देखील आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेकडून कारखान्यांवरील जनावरांचे देखील लसीकरण केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी दिली.
याबाबत बोलताना डॉ. विधाटे म्हणाले, की लम्पीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी सुटी न घेता काम करत आहेत, त्याला सध्या यश मिळताना दिसत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव दिसत असून इंदापूर, खेड आणि बारामती तालुक्यात बाधा होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मृत्यूचे प्रमाण देखील बारामती आणि इंदापूरमध्ये अधिक आहे. सध्या ५६४ जनावरांवर उपचार सुरू असून त्यापैकी ५६ जनावरे गंभीर आहेत. ५८४१ बाधित जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत, तर आठ लाख ३२ हजार ९१२ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील लम्पी आजार नियंत्रणात असल्याने नगर आणि सातारा जिल्ह्यासाठी पाच डॉक्टरांना जिल्हा परिषदेकडून पाठविण्यात आले आहे.