मी १९ ला मुंबईत जाणारच; पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे आक्रमक

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण १५ व्या दिवशीही सुरू असून राज्यभरातील वातावरण कमालीचे तापले आहे. दरम्यान, १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांच्या या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेत त्यांनी आजपासून सलाईन, पाणी आणि सर्व वैद्यकीय उपचार पूर्णपणे बंद करण्याचा टोकाचा निर्णय जाहीर केला आहे.
जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम २०२५ चे उल्लंघन होण्याची शक्यता वर्तवत मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “दोन दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने आम्हाला मुंबईत येण्यापासून रोखता येणार नाही, असा स्पष्ट निकाल दिला होता. असे असताना पोलीस परवानगी नाकारून न्यायदेवतेचा अवमान करत आहेत. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच आम्ही नियम मोडणार असा अंदाज हे कोणत्या आधारावर बांधत आहेत? हे सरकार नेमके कोणत्या कायद्याने राज्य चालवत आहे?”
हेही वाचा
पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करताना ते म्हणाले, “आंदोलनात मिरवणुका काढता येणार नाहीत असे कारण दिले जात आहे. मग गणेशोत्सवात मिरवणुका निघणार नाहीत का? हे नेमके कुठले हिंदुत्व आहे? राज्य अस्थिर करण्याचे षडयंत्र कोण रचत आहे हे आता जनतेसमोर आले आहे.”
१५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच; सलाईन-उपचार बंद
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा निर्धार पुन्हा स्पष्ट केला असून १५ सप्टेंबर रोजी अंतरवली सराटी येथून शांततेच्या मार्गाने मुंबईकडे कूच करण्यात येणार असल्याचे सांगितले. “१९ सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर लोकशाही मार्गाने शांततेत आमचे बेमुदत उपोषण सुरूच राहील. पोलिसांनी परवानगी द्यायची की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, आमचे वकील बांधव त्याबाबत कायदेशीर निर्णय घेतील. मी मात्र मुंबईत जाणारच,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले. तसेच या दडपशाहीचा निषेध म्हणून त्यांनी आजपासून सलाईन, पाणी आणि सर्व उपचार बंद केले असून परिस्थिती चिघळल्यास शासन जबाबदार राहील, असा इशारा दिला आहे.





