महिला आशिया चषक २०२६: सेमीफायनलचे ४ संघ निश्चित! फायनलमध्ये भारत-पाक भिडणार?

Women’s Asia Cup 2026 | महिला आशिया चषक २०२६ स्पर्धेतील साखळी फेरीचे सर्व सामने पूर्ण झाले असून उपांत्य फेरीचे (सेमीफायनल) चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. बांगलादेश आणि युएई यांच्यातील शेवटच्या साखळी सामन्यानंतर भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या चार संघांनी बाद फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.
स्पर्धेतील ‘अ’ गटामध्ये भारतीय संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे, तर बांगलादेशचा संघ ‘ब’ गटामध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे गुरुवारी (१० सप्टेंबर) पहिल्या उपांत्य फेरीत भारत आणि बांगलादेश हे दोन संघ आमनेसामने येतील. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार असून, विजयी संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल.
हेही वाचा
मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्यात येणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दुसऱ्या सेमीफायनलमध्ये श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान
‘अ’ गटात पाकिस्तानने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात हाँगकाँगचा ७२ धावांनी पराभव करत ४ गुणांसह दुसरे स्थान मिळवले. तर ‘ब’ गटामध्ये श्रीलंकेने निर्विवाद वर्चस्व गाजवत अव्वल स्थान राखले. त्यामुळे दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात ११ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर चुरस पाहायला मिळेल.
फायनलमध्ये भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज लढतीची शक्यता
उपांत्य फेरीच्या समीकरणामुळे अंतिम फेरीत पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात विजेतेपदाची लढत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने बांगलादेशला पराभूत केल्यास आणि दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेवर मात केल्यास आशिया चषकाच्या महाअंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील थरार चाहत्यांना अनुभवता येणार आहे.





