मुंबईतील १९९ अतिरिक्त शिक्षकांचे तातडीने समायोजन करा
महापालिका शाळा किंवा रात्रशाळांमध्ये पात्रतेनुसार नियुक्ती; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई : मुंबईतील अतिरिक्त ठरलेल्या १९९ शिक्षकांचे समायोजन अद्याप प्रलंबित आहे. या शिक्षकांची पात्रता तपासून त्यांचे महापालिका शाळांमध्ये किंवा रात्रशाळांमध्ये तातडीने समायोजन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी सर्व संबंधितांनी समर्पित भावनेने एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
विधान परिषद सदस्य ज. मो. अभ्यंकर यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मंत्रालयात याबाबत बैठक घेण्यात आली. शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्यासह संबंधित अधिकारी ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले.
मुंबईतील रात्रशाळांमध्ये शिक्षकांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे का, याची तपासणी करावी. रात्रशाळांमधील दुबार शिक्षकांनी प्रत्यक्ष केलेल्या कामाचे परीक्षण करून वेतनाची प्रकरणे प्रलंबित असल्यास ती मार्गी लावावीत, अशा सूचनाही भुसे यांनी दिल्या.
शिक्षकांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली वैद्यकीय देयके आवश्यक निकष निश्चित करून निकाली काढावीत, अशी सूचना करण्यात आली. तसेच प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना आणि माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या संचित अर्जित रजेचे रोखीकरण करण्यासाठी आवश्यकतेनुसार नियमांमध्ये बदल करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
हेही वाचा – जिल्हा स्त्री रुग्णालयात एम्सच्या मानकानुसार अत्याधुनिक अतिदक्षता विभाग उभारणार
निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडविण्याच्या सूचना
सत्राच्या मध्यात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सत्र समाप्तीपर्यंत पुनर्नियुक्ती दिल्यानंतर त्यांचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे देता येत नसल्याची प्रकरणे किती आहेत, याची माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले. अशा कर्मचाऱ्यांना मानधन देण्याबाबत कार्यवाही करावी, असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.
यापुढे निवृत्त होणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या जागी आधीपासूनच पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून शाळांच्या कामकाजावर परिणाम होणार नाही, अशी सूचनाही त्यांनी केली.





