नेपाळच्या महापुरात १६२ जणांचा मृत्यू, ३०० भारतीय बेपत्ता; ईशा फाऊंडेशनच्या ७७ पर्यटकांचा ठावठिकाणा लागेना!

Nepal flood missing Indians | नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पुरामुळे आलेल्या महाप्रलयाने मानवी प्रयत्नांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. हिमस्खलनामुळे ही पूरस्थिती निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. मात्र, या पुरामुळे काही क्षणांत मोठ्या वेगाने आणि प्रचंड प्रमाणावर आलेल्या पाण्यामुळे गावेच्या गावे वाहून नेल्याची भयानक दृश्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागली आहेत. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या दृश्यांमध्ये निसर्गाचा कोप आणि जगण्यासाठीची माणसाची धडपड अशा दोन्ही बाबी प्रकर्षाने जाणवत असल्याचे दिसून येत आहे. नेपाळमधील या पूरस्थितीत जवळपास ३०० भारतीय बेपत्ता असून त्यात ईशा फाऊंडेशनच्या ७७ पर्यटकांचादेखील समावेश आहे. आतापर्यंत या पुरात १६२ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.
बुधवारी सकाळच्या सुमारास नेपाळच्या रसुवा जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला. तिबेटच्या सीमेला लागूनच नेपाळमधील हा भाग असून तिबेटमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळे ही भीषण पूरस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे भोते कोशी आणि त्रिशुली नद्यांना मोठा पूर आला आहे. या पूरस्थितीमुळे नेपाळमध्ये आतापर्यंत जवळपास १५०० नागरिक बेपत्ता झाल्याची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. “प्रत्यक्ष घटनास्थळांचे व्हिडीओ फूटेज आणि प्रभावित क्षेत्रातून आलेल्या माहितीवरून असे दिसून येते की मोठ्या प्रमाणावर बर्फ आणि दगडांचा राडारोडा लेंडे खोला नदीमध्ये दाखल झाला. हीच नदी पुढे भोते कोशी नदीला जाऊन मिळते. संशोधकांच्या मते अचानक झालेल्या या घडामोडींमुळे नद्यांना पूर आला असावा”, अशी माहिती ICIMOD कडून बुधवारी संध्याकाळी जारी करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
हेही वाचा
‘उमेद’मुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
STORY | Nepal floods: 37 tourists from Tamil Nadu, 77 Isha Foundation members among those missing
Over 130 Indians, including many pilgrims on Mansarovar Yatra, were missing and scores of others were stranded in Nepal after flash floods swept through its central districts,… pic.twitter.com/yQWsDhpB9E
— Press Trust of India (@PTI_News) August 26, 2026
ईशा फाऊंडेशनचे पर्यटकही बेपत्ता
दरम्यान, ईशा फाऊंडेशनतर्फे नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेले जवळपास ७७ जण पुरात बेपत्ता झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. याशिवाय, तमिळनाडूतून नेपाळला गेलेले ३७ पर्यटकदेखील बेपत्ता झाले आहेत. मानसरोवर यात्रेसाठी भारतातून गेलेल्या पर्यटकांचादेखील नेपाळच्या पुरात बेपत्ता झालेल्या ३०० भारतीयांमध्ये समावेश आहे. याशिवाय, अनेक भारतीय पर्यटक पुरामुळे नेपाळमध्येच ठिकाठिकाणी अडकून पडले आहेत. नेपाळच्या मध्यवर्ती भागातील अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून असंख्य पर्यटकांना नियोजित स्थळी पोहोचता येत नसल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे.





