मनुचा अपमान का करता? योगी आदित्यनाथ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल!

Yogi Adityanath | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या मनुस्मृतीवरील टीकेवरून त्यांच्यावर हल्लाबोल केला. राहुल गांधी भारताच्या परंपरेचा अपमान करून तरुणांना भडकवत असल्याचा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला. रायबरेली येथे ८७९ कोटी रुपयांच्या ३४६ विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात योगी बोलत होते.
महाराष्ट्रातील विद्यार्थिनींशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी शनिवारी ‘मनुस्मृतीच्या मानसिकते’वर टीका केली होती. तसेच मुलींनी पितृसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवावा आणि महिलांनी स्वतःच्या आयुष्यावर स्वतःचा अधिकार ठेवावा, असे आवाहन केले होते.
राहुल जी, आप मनु, प्रभु श्री राम और भारत की विरासत पर टिप्पणी करते हैं।
मनु को जानना है तो अथर्ववेद, शतपथ ब्राह्मण और मत्स्य पुराण पढ़िए… pic.twitter.com/moMrzZ7jKq
— Yogi Adityanath (@myogiadityanath) August 24, 2026
हेही वाचा
गुरमीत राम रहीम पुन्हा तुरुंगाबाहेर; २१ दिवसांचा फर्लो मंजूर, दोन महिन्यांत दुसऱ्यांदा सुटका
तुमची मूल्ये भारताच्या परंपरांशी जुळत नसतील, तरीही तुम्ही सध्याच्या पिढीशी खेळू नये. त्याऐवजी, एका जबाबदार नेत्याप्रमाणे वागून उदाहरण बनाव. मनुस्मृतीवर विश्वास ठेवायचा किंवा नाही हा राहुल गांधींचा प्रश्न आहे, मात्र त्यांनी चुकीची विधाने करू नयेत, असेही त्यांनी म्हटले.
योगी आदित्यनाथ यांनी मनुस्मृतीच्या संदर्भात अथर्ववेद, शतपथ ब्राह्मण, महाभारत आणि मत्स्य पुराण यांचा उल्लेख करत, मनुचा अपमान का करता? असा प्रश्न राहुल गांधींना उपस्थित केला. योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर देशाची आणि समाजाची विभागणी केल्याचा आरोप केला. काँग्रेसने राजकारणातून सामाजिक एकता कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी केला.





