राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावर पैशांची उधळण; चौकशी होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजमधील विद्यार्थिनींना प्रवेश, सोशल इन्फ्लुएंसर्सना ‘पॉझिटिव्ह कंटेंट’साठी पैसे दिल्याचा दावा; नवनाथ बन यांच्या आरोपांची पडताळणी करण्याचे आश्वासन

पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे देऊन बोलावण्यात आल्याचा गंभीर दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या आरोपांची पुराव्यांच्या आधारे पडताळणी केली जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मीडियाशी संवाद साधताना फडणवीस यांनी दावा केला की, कार्यक्रमाला येणाऱ्या सुमारे ९० ते ९५ टक्के मुली या काँग्रेस नेत्यांशी संबंधित कॉलेजमधील आहेत. इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी आणले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना कार्यक्रम आणि राहुल गांधी यांच्याबाबत केवळ सकारात्मक कंटेंट प्रसारित करण्याच्या सूचना देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘पॉझिटिव्ह कंटेंट टाकला तरच पैसे’
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना कार्यक्रमासाठी बोलावून राहुल गांधी आणि काँग्रेसच्या बाजूने सकारात्मक पोस्ट करण्यास सांगितले जात असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. सकारात्मक कंटेंट टाकल्यास पैसे दिले जातील, मात्र नकारात्मक कंटेंट प्रसारित केल्यास पैसे दिले जाणार नाहीत, असे सांगण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी यापूर्वी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी सुमारे तीन हजार लोकांना पैसे देऊन आणले जात असल्याचा आरोप केला होता. प्रत्येक व्यक्तीसाठी ३० ते ३५ हजार रुपये खर्च केले जात असल्यास एकूण खर्च ९ ते १० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा दावा बन यांनी केला होता.
हेही वाचा – ४ वर्षांखालील मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या ‘कॉम्बिनेशन’ औषधांवर केंद्राचे निर्बंध
‘नवनाथ बन यांच्या आरोपांची पडताळणी करू’
नवनाथ बन यांनी केलेले आरोप पुराव्यांच्या आधारे असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या आरोपांची पडताळणी केली जाईल, असे स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्यासाठी वाद निर्माण केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कार्यक्रमापूर्वी पुण्यात NSUI-अभाविपमध्ये राडा
राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री NSUI आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास दोन्ही गटांमध्ये धुमश्चक्री झाली. त्यानंतर पोलिसांनी काही जणांविरोधात गुन्हे दाखल केले.
काँग्रेसने मात्र केवळ आपल्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या आधीच पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.





