ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा समता व सामाजिक परिवर्तनाचा संदेश मोलाचा : नगरसेवक डॉ. सुहास कांबळे

निगडी येथील अण्णाभाऊ साठे स्मारकात विचार प्रबोधन पर्वानिमित्त डॉ. सुहास कांबळे यांचे अभिवादन

ज्येष्ठ नेते संदिपान झोंबाडे यांच्यासह जयंती उत्सव समितीच्या वतीने सन्मान

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने आणि परिवर्तनवादी विचारांनी समाजातील वंचित, उपेक्षित आणि कष्टकरी घटकांना आत्मभान देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारणे, पुढे नेणे आणि नव्या पिढीपर्यंत त्यांचे सामाजिक योगदान पोहोचवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक तथा शहर सुधारणा समितीचे सदस्य डॉ. सुहास कांबळे यांनी केले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विचार प्रबोधन पर्वानिमित्त निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे आयोजित कार्यक्रमास डॉ. सुहास कांबळे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

हेही वाचा

सेक्टर क्रमांक १२ मधील विद्यार्थी, कामगार व प्रवाशांसाठी निगडी बससेवेचा शुभारंभ

१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वानिमित्त उपस्थित समाज बांधवांना डॉ. सुहास कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या. हे विचार प्रबोधन पर्व अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा आणि विचारांचा जागर करण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. समाजातील सर्व घटकांनी अण्णाभाऊंच्या विचारांचा स्वीकार करून सामाजिक सलोखा आणि समतेची भावना अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, कार्यक्रमास उपस्थित राहून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केल्याबद्दल ज्येष्ठ नेते श्री. संदिपानजी झोंबाडे तसेच जयंती उत्सव समितीचे आजी-माजी अध्यक्ष व सदस्य यांच्या वतीने नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, समाज बांधव, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे फक्त एक साहित्यिक किंवा लोकशाहीर नव्हते, तर ते सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी भाष्यकार होते. त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या संघर्षाला आवाज दिला. समता, बंधुता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाची मूल्ये समाजात रुजविण्यासाठी त्यांच्या विचारांचे चिंतन आजही तितकेच महत्वपूर्ण आहे, त्यांच्या साहित्यामध्ये केवळ मनोरंजन नसून सामाजिक परिवर्तनाची ताकद होती. त्यामुळे अण्णाभाऊंचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे”

– डॉ. सुहास कांबळे, नगरसेवक, पिं. चिं. मनपा. 

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button