‘कॉक्रोच जनता पार्टी’ राजकारणात प्रवेश करणार का? प्रवक्त्यांचे सूचक विधान; म्हणाले…

नवी दिल्ली | नीट (NEET) परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरून जंतरमंतरवर सलग ३६ दिवस आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) सर्व मागण्या अखेर केंद्र सरकारने मान्य केल्या. शनिवारी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सीजेपीने आपले आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. या ऐतिहासिक यशानंतर आता कॉक्रोच जनता पार्टी प्रत्यक्ष राजकारणात उतरणार का, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
या सर्व चर्चांवर सीजेपीच्या प्रवक्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी सध्या तरी थेट राजकारणात सक्रिय होण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Any plans for full time politics for CJP spox Saurav Das? He answers pic.twitter.com/hknDwTJZtu
— Padmaja Joshi (@PadmajaJoshi) July 25, 2026
हेही वाचा
माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीने बँक मॅनेजरच्या कानशिलात लगावली; धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद
भविष्यातील राजकीय प्रवेशाबद्दल बोलताना आशुतोष रांका म्हणाले, “गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही घरापासून दूर आहोत. सध्या माझ्या डोक्यात एकच गोष्ट आहे, ती म्हणजे घरी जाऊन शांत झोप घेणे आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे. हा विजय आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.” पुढे राजकारणात येणार का? यावर उत्तर देताना त्यांनी मिश्किलपणे, “भारतात कोणत्याही गोष्टीला ‘नाही’ म्हणायचं नाही,” असे सूचक विधान केले.
तर दुसरीकडे, सौरव दास यांनी पक्षाची मुख्य भूमिका मांडताना सांगितले की, “सध्या आमचे मुख्य ध्येय ही चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवणे हेच आहे. देशात आधीच ७५० ते ८०० राजकीय पक्ष अस्तित्वात आहेत, परंतु एकही पक्ष युवकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे सत्तेत कोणताही पक्ष असो, त्यांना युवकांच्या मागण्या मान्य करायला लावणे आणि त्यांच्यासाठी काम करायला भाग पाडणे, हाच आमचा खरा अजेंडा आहे.”





