पवना धरण ९७% भरले! नदीपात्रात विसर्ग वाढवला; ७,५०० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात

पिंपरी | पवना धरणातील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचल्याने धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती पवना धरण प्रकल्प प्रशासनाने दिली आहे. सध्या आज रविवार (दि.२६) १२ वाजता पवना नदीपात्रात ५,५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून तो वाढवून ७,५०० क्युसेक करण्यात येणार आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ केली जाणार असून, परिस्थितीनुसार तो ९,००० क्युसेकपर्यंत वाढविण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
हेही वाचा
अनाहत सिंगनं रचला इतिहास! ज्युनियर स्क्वॉश विश्व अजिंक्यपद स्पर्धेचं पटकावलं विजेतेपद
सततच्या पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यांमधील पाणीपातळी अचानक वाढू शकते. तसेच पवना नदीच्या सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि लाभधारकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नदीपात्रातील शेती अवजारे, कृषी पंप, जनावरे तसेच इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पवना धरण प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, पवना नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी खबरदारी घेण्यासह आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतरासाठी तयारी ठेवावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





