अभिजीत दिपकेंसह CJP च्या कोअर टीमला आज अटक होणार? जंतर-मंतरवरील आंदोलनाला मोठे वळण!

Abhijit Deepak | NEET परीक्षेतील अनियमिततेविरोधात जंतर-मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनाला आता नवीन वळण आले आहे. ज्येष्ठ विचारवंत आणि आंदोलक सोनम वांगचुक यांनी गुरुवारी मध्यरात्री उशिरा आपले बेमुदत उपोषण मागे घेतले असले, तरी हे आंदोलन इथेच थांबणार नाही, असा निर्धार ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) अभिजीत दिपके यांनी व्यक्त केला आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सोनम वांगचुक यांनी रुग्णालयात आपले उपोषण सोडले. NEET परीक्षेच्या मुद्द्यावर आगामी संसदेच्या अधिवेशनात सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी जंतर-मंतरवर आंदोलकांशी संवाद साधताना अभिजीत दिपके यांनी आज रात्री CJP च्या कोअर टीमला अटक होण्याची भीती व्यक्त केली. काल प्रकृती खालावल्यामुळे आणि सलाईनवर असल्याने आंदोलनस्थळी उपस्थित राहू शकलो नाही, याबद्दल त्यांनी आंदोलकांची माफी मागितली. ते म्हणाले, “गेल्या ३५ दिवसांपासून आम्ही अत्यंत शांततापूर्ण आणि संविधानाच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. स्वतंत्र भारतात इतके शांततापूर्ण आंदोलन झाले नसेल. मग सरकारला भारताच्या संविधानाची अडचण काय आहे? आम्हाला अटक का केली जात आहे?”
हेही वाचा
पवना धरण ९५ टक्के भरले! आज सकाळी ९ वाजल्यापासून विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
“सरकारने तिसरी चूक करू नये!”
सरकारला थेट इशारा देताना दिपके म्हणाले, “सरकारने याआधी दोन चुका केल्या आहेत. पहिली म्हणजे, सोनम सरांना इथून नेऊन आंदोलन मोठे केले आणि दुसरी म्हणजे २० जुलै रोजी आंदोलक मुलींवर लाठीचार्ज करून हे आंदोलन देशभर पसरवले. आता आम्हाला अटक करून सरकारने तिसरी चूक करू नये, अन्यथा हे आंदोलन अधिक उग्र आणि व्यापक होईल.”
समर्थकांना अन् आंदोलकांना शांततेचे आवाहन
आपल्याला अटक झाल्यास आंदोलनाची पुढील धुरा देशवासीयांनी संभाळावी, असे आवाहन करत दिपके म्हणाले, “जर आज रात्री आमच्या टीमला अटक झाली, तर हे आंदोलन संपूर्ण देशात आणि प्रत्येक भागात शांततापूर्ण पद्धतीने पुढे नेण्याची जबाबदारी तुमची आहे. हिंसा करणारा व्यक्ती CJP चा समर्थक असू शकत नाही. आपण सर्व कायदा पाळणारे देशभक्त आहोत, त्यामुळे देशाचे नुकसान होईल असे कोणतेही कृत्य करू नका.”





