राज्यातील २९ लाख विद्यार्थी अपार आयडी नोंदणीविना; ऐन निवडणुकीच्या काळात नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश…

मुंबई : राज्यातील सुमारे २९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची अद्याप अपार आयडी नाेंदणी झालेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची तातडीने ३१ जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिले आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या कामाबरोबरच आता शिक्षकांना अपार आयडी नोंदणीचे कामही युद्धपातळीवर करावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांचे डिजिटल पद्धतीने ट्रॅकिंग करणे, शैक्षणिक प्रगतीचे निरीक्षण, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विविध बाबींचे संनियंत्रण करण्यासाठी अपार आयडी नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. विद्यार्थ्यांचे अपार आयडी यू-डायस प्लस प्रणालीमार्फत काढण्याबाबत सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
यू-डायस प्लस प्रणालीच्या १ जानेवारी २०२६ रोजीच्या अहवालानुसार राज्यातील १८४ लाख २१ हजार (८५.५ टक्के) विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून २०४ लाख ८२ हजार (९५ टक्के) विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण झाले आहे. तसेच शाळेतील पूर्वप्राथमिक व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्यासाठी अद्याप नोंदणी केली नसल्याचे अहवालावरून निदर्शनास येत आहे. अहवालानुसार २९ लाख ८ हजार विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत अपार आयडी काढण्यासाठी नोंदणी केली नसल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा – “माय मराठीसाठीची लढाई आता प्रत्येकाच्या उंबरठ्यावर…” साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचे मत
केंद्र सरकारचे राष्ट्रीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली हाेणाऱ्या बैठकीत राज्यातील विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याबाबत आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याची प्रक्रिया ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्यासाठी जिल्हा, तालुका व केंद्र स्तरावर शिबिरांचे आयोजन करून शाळांमधील प्रलंबित विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, तसेच जिल्हा व तालुका स्तरावरून दररोज आढावा घ्यावा, असे निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांनी दिले. तसेच अपार आयडी काढताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांशी (प्राथमिक व माध्यमिक) संपर्क साधण्याची सूचनाही त्यांनी केली.
सध्या राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत. बहुतांश शिक्षकांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांची अपार आयडी नोंदणी करताना शिक्षकांना तारेवरची करसत करावी लागणार आहे. एकीकडे निवडणुकीच्या कामे, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांची अपार आयडी नोंदणी करताना शिक्षकांची दमछाक होणार आहे. त्यामुळे शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.





