आंध्र प्रदेशमध्ये खासगी बसचा भीषण अपघात; १० जणांचा मृत्यू, २३ जखमी

Bus Accident | आंध्र प्रदेशातील अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यात शुक्रवारी (१२ डिसेंबर) पहाटे मोठी दुर्घटना घडली. चित्तूर जिल्ह्यातील प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस मरेडुमिल्ली घाटातील एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमारे ५.३० वाजता खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण ३७ जण (३५ प्रवासी, एक चालक आणि एक क्लीनर) प्रवास करत होते.
अपघातानंतर स्थानिक गावकऱ्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच चिंतूर पोलीस, बचाव पथके आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अंधार आणि घाटातील कठीण परिस्थिती असूनही बचाव पथकांनी बसचा काही भाग कापून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. बचावकार्य अद्याप सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन
जखमींना प्राथमिक उपचारांसाठी १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंतूर सीएचसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी गंभीर जखमींची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना अधिक चांगल्या उपचारांसाठी भद्राचलम येथील रुग्णालयात हलवण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. अपघाताची माहिती मिळताच चिंतूरचे उपजिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत बचाव मोहिमेचे मार्गदर्शन केले.
प्राथमिक माहितीनुसार बसमधील प्रवासी हे भद्राचलम मंदिर दर्शन करून अन्नवरमकडे जात होते. या गटाने चित्तूरमधून ३५ सीटर बस भाड्याने घेतली होती. मरेडुमिल्ली घाटातील धोकादायक वळणावर बसचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.





