छगन भुजबळांचा जामीन कधीही रद्द होऊ शकतो; ‘या’ नेत्याने व्यक्त केला संशय

छत्रपती संभाजीनगर : मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाला विरोध दर्शवला असल्यास, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असा सल्ला शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी दिला आहे. भुजबळ हे सध्या जामिनावर असून, त्यांचा जामीन कधीही रद्द होऊ शकतो, असेही दानवे यांनी म्हटले आहे.
दानवे म्हणाले, “भुजबळ यांना मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा तिटकारा आहे, तर त्यांनी मंत्रिमंडळात राहू नये. त्याकडे पाहूही नये. यामागे राज्य सरकार काही राजकीय खेळ खेळत आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. राज्यात नेतृत्व करणाऱ्या लोकांचा उद्देशच संशयास्पद वाटतो.”
हेही वाचा – आरबीआयच्या सोन्याच्या साठ्याने मोडले सर्व विक्रम ; पहिल्यांदाच १०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला
सदन घोटाळ्याचा उल्लेख करत दानवे म्हणाले, “या प्रकरणावर मोठी भाषणे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. भुजबळ यांना जेलमध्ये टाकणारेही भाजपच होते. त्याच भाजपच्या कृपेने ते आज जामिनावर आहेत. जामीन कधीही रद्द होऊ शकतो.”
मंत्रिमंडळाने नेमलेल्या समितीचे भुजबळ हे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना संबंधित अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, असेही दानवे यांनी नमूद केले. “विखे हे मनाने करतात असे काही नाही. ते विखारी आहेत, तर मग तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राजकीय भूमिका घेणाऱ्यांविषयी बोलताना दानवे म्हणाले, “हे सगळे वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रातील लोक आहेत. कोणत्या बाजूने मत व्यक्त केले, हे स्पष्ट नाही. राजकीय पक्ष एकांगी बाजू घेत नाही. विजय वड्डेटीवार आणि भुजबळ हे खांद्याला खांदा लावून आणि गळ्यात गळा घालून बोलत होते; आता त्यांना ते वाईट वाटते, त्याला काय करणार?”





