आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाचा संघ जाहीर; सूर्यकुमार यादव कर्णधार

Asia Cup 2025 | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आशिया कप २०२५ साठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादव या संघाचे नेतृत्व करेल, तर शुभमन गिलला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय, भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
आशिया कप २०२५ हा टी-२० स्वरूपातील सामना ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे होणार आहे. भारतीय संघ ग्रुप ए मध्ये पाकिस्तान, ओमान आणि यूएई यांच्यासोबत आहे. भारताचा पहिला सामना १० सप्टेंबरला यूएईविरुद्ध दुबईत होईल, तर १४ सप्टेंबरला बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना खेळवला जाईल.
हेही वाचा : मोठी बातमी! लोणावळ्यात पावसाचा इशारा; 20 व 21 ऑगस्ट रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर
भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित राणा, रिंकू सिंग.
राखीव खेळाडू :
प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, ध्रुव जुरेल, यशस्वी जायसवाल.
आशिया चषकाचा १७ वा हंगाम ९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार आहे. यावेळी भारत केवळ जिंकण्याच्या इराद्यानेच नाही तर आपले जेतेपद राखण्याच्या इराद्यानेही स्पर्धेत उतरेल. २०२३ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशिया चषकाचा १६ वा हंगाम जिंकला होता. भारत हा आशिया चषकातील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी ही बहु-राष्ट्रीय स्पर्धा ८ वेळा जिंकली आहे. यावेळी भारतीय संघाला ९ व्यांदा आशिया चषक जिंकण्याची संधी असेल.





