चाकणच्या उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी १६ ऑगस्टला बैठक; उद्योगमंत्री उदय सामंत

पुणे | चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये विविध बातम्या प्रसिद्ध होत आहेत. रस्त्यांच्या समस्येमुळे चाकणमधील काही कंपन्या महाराष्ट्राबाहेर किंवा राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्यातून रोजगारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज चाकणमधील औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. उद्योजकांच्या समस्या केवळ चर्चेपुरत्या न ठेवता त्या प्रत्यक्ष समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याच्या दृष्टीने दि. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता चाकण येथे उद्योजक आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष बैठक घेण्यात येणार आहे.
हेही वाचा
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ सज्ज; जाणून घ्या सामने कुठे आणि किती वाजता लाईव्ह पाहाता येणार?
चाकण हे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील महत्त्वाचे केंद्र असून, येथील उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि उद्योजकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे याला शासनाचे प्राधान्य आहे. रस्ते, वाहतूक तसेच इतर पायाभूत सुविधांबाबत उद्योजकांच्या असलेल्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन संबंधित विभागांच्या समन्वयातून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, चाकणमधील औद्योगिक संघटनांनीही उद्योगमंत्र्यांसोबत होणारी चर्चा सकारात्मक पद्धतीने करण्याचे आश्वासन दिले आहे. उद्योग महाराष्ट्रातून स्थलांतरित होण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच विद्यमान उद्योगांचे संरक्षण करून चाकण परिसरातील रोजगाराच्या संधी कायम राहाव्यात, यासाठी शासन आणि औद्योगिक क्षेत्र यांच्यात समन्वयातून मार्ग काढला जाईल.
चाकणच्या औद्योगिक विकासाला गती देताना उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून, संबंधित सर्व घटकांशी संवाद साधून ठोस निर्णय घेतले जातील, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.





